नवी दिल्ली : देशातील ऊर्जानिर्मिती केंद्रांची गरज भागवू शकेल, एवढा पुरेसा कोळसासाठा उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीने रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी देण्यात आले. अपुऱ्या कोळसासाठाअभावी वीजपुरवठा खंडित होण्याची भीती अनाठायी असल्याचेही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या ऊर्जा प्रकल्पांकडे ७२ लाख टन इतका कोळसासाठा असून, आणखी चार दिवसांसाठी तो पुरेसा आहे. तसेच ‘कोल इंडिया लिमिटेड’कडे आणखी ४०० लाख टन साठा उपलब्ध असून, त्याचा पुरवठा ऊर्जा केंद्रांना केला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
यावर्षी कोळशापासूनच्या ऊर्जानिर्मितीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोळसा कंपन्यांकडून होणाऱ्या कोळसापुरवठ्यामुळेच ही वाढ शक्य झाली आहे. सध्या देशातल्या सर्व औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना दररोज, १८.५ लाख टन कोळसा लागतो. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने, कोळसापुरवठ्यात अडचणी आल्या. प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा रोजच केला जातो. त्यामुळेच, कोळशाच्या उपलब्धतेबाबत कुठलीही भीती बाळगली जाऊ नये, असे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खरे तर, यंदाच्या वर्षात देशांतर्गत कोळसा उत्पादनामुळे कोळशाच्या आयातीला पर्याय उभा केला आहे. देशभरात यंदा प्रचंड पाऊस पडत असूनही, ‘कोल इंडिया लिमिटेड’ने ऊर्जा कंपन्यांना २५५ मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला. यंदा ‘सीआयएल’ने सर्वाधिक पुरवठा केला. ‘सीआयएल’कडून वीजनिर्मिती कंपन्यांना दररोज १४ लाख टन कोळशाचा पुरवठा केला जातो. पाऊस कमी झाल्यानंतर लगेचच हा पुरवठा दररोज १५ लाख करण्यात आला असून, लवकरच त्यात आणखी भर घातली जाणार आहे. देशांतर्गत कोळसासाठ्यामुळे देशात, मुसळधार पाऊस, कोळशाच्या आयातीत घट आणि कोळशाच्या मागणीत अचानक वाढ अशा अडचणी असतानाही, ऊर्जानिर्मितीला पाठबळ मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात, कोळसापुरवठ्यात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात, कोळशाच्या किमती वाढल्याने, आयात होणाऱ्या कोळशात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र, देशांतर्गत कोळसा उत्पादन २४ टक्क्यांनी वाढले आहे. देशात कोळशाची स्थिती समाधानकारक असून, ‘कोल इंडिया’तर्फे दररोज, २.५ लाख टन कोळसा बिगर वीजनिर्मिती कंपन्यांना पाठवला जात आहे.