आज ११ ऑक्टोबरला पुन्हा या आघाडीने बंद केला आहे. का? तर म्हणे लखीमपूर उत्तर प्रदेशच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा बंद आहे. हाच न्याय लावला, तर महाराष्ट्रातल्या जनतेने या महाविकास आघाडीविरोधात दररोजच बंद पाळायला हवा. पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंह, दिशा, पूजा, हिरन यांचे काय झाले? कोरोनाकाळातील वाताहत त्यावर केंद्राकडून मदत मागत नुसते ‘फेसबुक लाईव्ह’ करणारे महाममहिम राज्य सरकार यांना महाराष्ट्र कसा विसरेल? यावर चिडलेल्या महाराष्ट्राचे म्हणणे आहे की, २०१९ साली महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हापासून तर महाराष्ट्रात स्थगितीचेच राज्य आहे. सगळ्या प्रमुख योजनांना स्थगिती देणे इतकेच काम या काळात झाले. कोरोनाकाळात तर महाराष्ट्र खर्या अर्थाने थांबवलाच होता. आता आणखी नव्याने ११ तारखेला हे सरकार काय बंद करणार आहे? यावर जाणकारांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडी सरकार या बंदच्या निमित्ताने जनमत जाणून घेणार आहे. काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनी तथाकथित शेतकर्यांच्या नावाने ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी या बंदला समर्थन केले होते. पण, महाराष्ट्रात या बंदला कुणी हिंग लावून विचारले नाही, असे दृश्य होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आवाहनाला आणि समर्थनाला महाराष्ट्राच्या जनतेने जुमानले नव्हते. तेव्हा महाविकास आघाडीचे नेते म्हणाले होते, जनतेने मनातून बंदचे समर्थन केले. नेहमीप्रमाणे त्यांनी मनोरंजन केले म्हणा. तर त्यावेळी जनतेने राकेश टिकैत आणि त्यांच्या समर्थकांना बिलकूल समर्थन दिले नाही. महाविकास आघाडी सरकारला वाटते की, आपण बंद करायचा. पण, जनता या बंदला अजिबात सहकार्य करणार नाही, हे तर सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. यशस्वी बंद करणार्यांचे काही गणित असते, जसे रस्त्यावर उतरून तोडफोड करणे, जाळपोळ करणे, गरिबांना धमकावणे आणि बंद यशस्वी करणे, तर या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या या बंदमध्ये रयतेच्या सूतळीच्या तोड्याचेही नुकसान झाले, हातावरचे पोट भरणार्याच्या घरी बंदमुळे नवरात्रीच्या दिवसात चूल पेटली नाही, तर याला जबाबदार कोण? की, या सगळ्यालाही जबाबदार मोदी आणि योगीच नव्हे तर या आघाडीच्या आणि पाकिस्तानच्या भाषेत रा. स्व. संघच जबाबदार असेल का? ‘पुछता हैं महाराष्ट्र’!
मुकी बिचारी जनता...
“प्रियांका गांधींमुळे इंदिरा गांधींचे अस्तित्व पुन्हा दिसले,” असे महाराष्ट्रातले स्वयंघोषित चाणक्य संजय राऊत म्हणाले. ते त्यांच्या एकट्याचे म्हणणे नाही. पण, त्यात त्यांची चूक नाही. कारण या सगळ्यांना यापुढे रेहान वाड्रामध्येही असेच नेहरू किंवा राजीव गांधी दिसतात, असे म्हणावे लागणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात सुप्रियाताईंमध्ये शरद पवार दिसतात की, अजित पवारांमध्ये शरद पवार दिसतात की, शरद पवारांच्या नातवांमध्ये शरद पवार दिसतात, हे ठरवण्याची तयारीही त्यांनी चालवली असेल.असो. कोरोनामुळे अक्षरशः आर्थिक कंबरडे मोडलेल्या आणि कोरोनामुळे कुणाला ना कुणाला गमावलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला प्रियांका इंदिरा गांधींसारख्या दिसतात, याचे काय सोयरसुतक असेल? महाराष्ट्राचे जनमत घेतले तर लोकांचा आक्रोश दिसेल. लोक म्हणत आहेत की, कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्रात अवकाळीमु ळे शेतीची नासधूस झाली. बांधावर जाऊन मदत वगैरे देण्याची भाषा करणारे बांधावर तर सोडाच, मंत्रालयातही गेले नाहीत. दोन वर्षांत गुन्हेगारीमुळे महाराष्ट्राची अक्षरशः देशभरात बदनामी झाली. पण, याची ना खंत, ना खेद, या सरकारला वाटला. प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींचे अस्तित्व दिसले. पण, तुमचे अस्तित्व महाराष्ट्रात कशाच्या रूपात दिसते आहे? यावरही सरकारने लक्ष द्यावे. इतिहासात पुढे महाराष्ट्र आणि कोरोना हा विषय येणारच आहे. त्यावेळी या काळात महाराष्ट्रात काय घडले, याचेही अस्तित्व उमटणार आहेच. महाराष्ट्रात तसेही आता महाराष्ट्राचे कैवार घेणारे राज्यात सत्तेत आहेत का? कू्रझवर अमली पदार्थ आणि त्यामुळे काही लोकांना पकडले गेले. याबद्दल याच राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा कोणत्या विषयावर घेतल्या, हे महाराष्ट्राने पाहिले. त्यातून महाराष्ट्रात काय अस्तित्व राखले हेसुद्धा जगाने पाहिले. साकीनाक्याच्या दलित भगिनीचा भयंकर मृत्यू आणि त्यामुळे सुन्न झालेल्या महाराष्ट्रात कसले अस्तित्व निर्माण झाले आहे, याचे उत्तर कोण देणार? अर्थात, सत्तेची नशा चाखण्यात मग्न झालेल्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सध्या महाराष्ट्रात सत्ता टिकवायची तर सोनिया मॅडमची मनधरणी आणि त्यासाठी त्यांच्या राजकन्येच्या गुडबुकमध्ये असणे गरजेचे आहे. बाकी महाराष्ट्राची जनता काय ‘मुकी बिचारी, कशीही हाका’ असेच यांना वाटते हे नक्की.
९५९४९६९६३८