मुंबई : मुंबईमध्ये मराठी शाळांची होणारी दुर्दशा हा महत्त्वाचा विषय ठरला आहे. यावर आता भाजपने आवाज उठवला असून भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठी भाषा आणि मराठी शाळेसंदर्भात एक पत्र लिहिले आहे. "शिवसेनेने मुंबईमध्ये जवळपास ३० वर्षे सत्ता गाजवली. मात्र, मुंबईत मराठीची अवस्था बिकट झाली आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला आहे. तर दुसरीकडे, मराठी शाळांची आणि भाषेची अवस्था देखील तशीच झाली आहे." अशी टीका अमित साटम यांनी केली आहे.
अमित साटम यांनी केलेल्या व्हिडियो ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "मराठी अस्मितेचा आधार घेत शिवसेनेने गेले ३० वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता राबवली याचे निष्कर्ष म्हणजे मुंबईतील मराठी शाळांची आणि मराठी भाषेची झालेली अधोगती उभा महाराष्ट्र पाहतोय. मुंबईमध्ये २०१० साली महानगरपालिकेच्या ४१३ मराठी शाळा होत्या आता तीच संख्या २८२ वर आलेली आहे. या निमित्ताने मराठी भाषा मंत्रालयासमोर कश्या प्रकारे भीक मागत उभी आहे याची जाणीव त्यांना व्हावी अशी आशा आहे."
पत्रामध्ये भाजप आमदार अमित साटम यांनी म्हंटले आहे की, "आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनंतर दि.१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलीदानाची सदैव आठवण करून देत असेलच! सत्ताधारी सेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे,याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब?"