वडील आणि राजकीय गुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Hemant Savara_1 &nbs
 
 
सामान्यांतून असामान्य माणसे तयार होत असतात. परंतु, असामान्य होऊन सामान्यांसारखे राहावे, वागावे व ते टिकवणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण दादांनी जीवनभर आचरणात आणले. दादांच्या जीवनातील हे विविध पैलू उलगडताना आपल्याला त्यांची अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिड्.मूढ करतात व दिशा दाखवतात. पहाडाएवढी कामे करूनसुद्धा त्यांची जाहिरात न करणारा राजकारणी हा विरळाच. टीकाकारसुद्धा कालांतराने त्यांचे प्रशंसक होऊन जात असत.
 
 
ऑक्टोबर २०१४, मध्यवर्ती विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं भिजत राहिलं होतं. निर्णय काही होत नव्हता. दादा म्हणजे विष्णुजी सवरा साहेब २००९ मध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार होते. साधारणपणे ज्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलेले असतात, ते त्याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करतात. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या मुलाखती जाहीर झाल्या. परंतु, दादांनी भिवंडी ग्रामीणऐवजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचे ठरवले व मुलाखत दिली.
 
पुढे युतीची बोलणी फिस्कटली. दादांना विक्रमगड मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळाली. खरंतर हा खूप मोठा निर्णायक प्रसंग होता व माझ्या दृष्टीने घातकही. चार वेळा वाडा मतदारसंघातून, पाचव्यांदा नव्याने निर्माण झालेल्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यामुळे हा निर्णय माझ्यासाठी व कदाचित राजकारणातील धुरिणांसाठी कुतूहलाचा, औत्सुक्याचा व चकीत करणारा होता. परंतु, तब्बल 35 वर्षांचा राजकारणातील अनुभव असल्याने त्यांच्या दूरदृष्टीपणाबद्दल कोणतीही शंका नव्हती आणि त्यांचा निर्णय धाडसी व योग्यच होता, हे त्यांनी निवडणूक जिंकून सिद्ध केले व अनुभवी असल्याने पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान पक्के केले. त्यांची राजकारणातील समज, द्रष्टेपणा व दूरदृष्टिकोन यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. १९८० मध्ये जेव्हा माधवराव काणे यांनी त्यांना स्टेट बँकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याविषयी सांगितले व विचारले, “तू शिकलास म्हणजे कुटुंब अथवा घराण्याचा विचार करशील, पण समाजाचा विचार कोण करणार? तुझ्यासारख्या शिकलेल्या वनवासी तरुणांनी आपल्या समाजासाठी काम केले पाहिजे!” त्यावेळी कुटुंबामध्ये त्यांच्याइतके शिकलेले कुणीही नव्हते. त्यामुळे या निर्णयाविषयी चर्चा कोणाशी करणार? सारासार विचार करत नोकरी सोडली व राजकारणात उतरले.
खरंतर मोठं कुटुंब! पाच बहिणी, तीन भाऊ, चुलते, मामा, मावशी असं मोठं घराणं. पुढे नोकरीही मिळाली, पण तिचाही राजीनामा दिला. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, यावर ते ठाम होते व तसा विश्वासही होता. पण, १९८० व १९८५ सलग दोन पराभवामुळे थोडे खच्चीकरण व्हायला लागले होते. काम चालू होतं. १९९० साली मात्र त्यांनी माधवरावांना सांगितले होते, “आता विजयी नाही झालो, तर पोटापाण्याचं काहीतरी बघावं लागेल.” माधवरावांचा विश्वास, दूरदृष्टी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे १९९० साली पहिला विजय मिळाला व नंतर इतिहास घडला. पण, १९८० ते १९९० ही दहा वर्षं खरंच परीक्षेची होती. तळागाळातील लोकांशी संवाद साधणं, संपर्क ठेवणं, काम उभं करणं, गावागावात कार्यकर्ता उभा करणं, पक्षाचा विचार रुजवणं, लोकांच्या सुखदु:खात सहभागी होणं, निष्ठावान कार्यकर्ते घडवणं या आणि अशा अनेक गोष्टींमधून त्यांनी स्वत:चा व पक्षाचा पाया रचला. त्यानंतर सलग सहा वेळा निवडून येऊन इतिहास घडवला व पक्षानेही दोनदा मंत्रिपद देऊन त्यांचा गौरव केला. या दहा वर्षांतच आम्ही भावंडे घडलो. आम्ही तीन भावंडे, मोठा मी, बहीण निशा मधली व छोटा संदेश अर्थात बंधू. सुरुवातीला परिस्थिती अतिशय बिकट होती. दादांना पक्षाचे तुटपुंजे मानधन मिळायचे, त्यावरच सगळ्या घराण्याचा गाडा चालायचा. सुदैवाने १९८५ साली आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली व प्रपंच थोडा सुसह्य झाला.
नंतरच्या काळात सहावीनंतर मला नवोदय विद्यालय येथे शिकण्याची संधी मिळाली. मी बोर्डी, ता. डहाणू येथे वसतिगृहात गेलो. केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर अशा शाळा देशभरात प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील आमची पहिलीच तुकडी होती. दादा, आई दोघंही वसतिगृहात शिकलेले असल्यामुळे त्यांना या गोष्टींची कल्पना होती. वसतिगृहातील शिक्षण म्हणजे मुलांना स्वावलंबी बनविण्याची पहिली पायरी आहे, असं त्यांना वाटत होते. मीसुद्धा तेथे राहण्यास तयार झालो. वसतिगृहाच्या नियमानुसार महिन्यातून एकदाच पालकांना आपल्या मुलांना भेटता येत असे. अन्य वेळी नाही. त्यामुळे दादाही कधी सगळ्यासोबत किंवा कधी एकटे भेटण्यास येत. अर्थात, येताना महिनाभर पुरेल एवढा खाऊ नक्की आणायचे. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असायचं. परीक्षेच्या वेळी मात्र अभ्यासात आळस करायचा नाही, नीट परीक्षा दे, असं आवर्जून सांगायचे. कालांतराने अकरावीसाठी जागा अपुरी पडल्याने आम्हाला सिल्व्हासा येथील नवोदय विद्यालयात पाठवले. तिथेही दादा, आमचे शेजारी नामदेव पाटील भेटायला यायचे. नवोदयमध्ये जरी असलो तरी त्यांच्या सततच्या येण्यामुळे व संपर्कामुळे एकटेपणाची जाणीव कधीच वाटली नाही.
बारावीनंतर मी व माझ्या मित्रांनी (डॉ. अनिरुद्ध पाटील व डॉ. प्रवीण भोले) मेडिकलला जायचे ठरविले होते. दादांना एमबीबीएसचा अर्ज भरतो, एवढंच सांगितले होते. त्यांनीही विश्वास दाखवून “मेडिकलला प्रवेश घे,” असे सांगितले होते. त्याप्रमाणे ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. एका आठवड्याने दादा सगळ्यांना घेऊन मला भेटायला जे. जे. हॉस्पिटलमध्ये आले होते. माझ्यावर त्यांनी मोठा विश्वास दाखवला होता. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मी नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, मसिना हॉस्पिटल, भायखळा, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा येथे गेलो. दादांनी मला आडकाठी केली नाही. हे माझ्याबाबतीतच नव्हे, तर ताई व बंधू यांनासुद्धा विश्वासात घेऊन पाठिंबा दिला. त्यांनी आम्हाला कधी अडवले नाही. त्यांच्या भावंडांनासुद्धा नेहमी पाठिंबा दिला व मार्गदर्शन करत राहिले. आमच्या घराण्यामध्ये एक दादा शिकले व त्यांनी अनेकांना शिकवले व आधार दिला. नोकरीलासुद्धा लावले. स्वत: घराण्यामध्ये मोठे असल्याची जाणीव ठेवली व जबाबदारीने सगळ्यांना वाढवले व मार्ग दाखविला. आमदार झाल्यानंतर मात्र त्यांनी त्यांचा मतदारसंघ हेच कुटुंब बनविले. सगळ्यांची आपुलकीने व मायेने चौकशी करणे, आमदारकीचा आव न आणता त्यांच्या सुखदु:खात सामील होणे, विधायक कामे करणे, यामुळे त्यांनी सगळ्यांना आपलेसे केले. यशाची अनेक शिखरे गाठत तब्बल सहा वेळा विजयी झाले. विजय मिळवल्यानंतर मात्र त्यांनी त्याचे श्रेय कार्यकर्त्यांना व जनतेला दिले. त्यामुळे त्यांची जनतेशी नाळ कधी तुटली नाही.
आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी जसे त्यांनी संबंध जोपासले होते, तसेच राजकीय विरोधकांशीसुद्धा चांगले संबंध जोडले होते. मतदारसंघातील स्वपक्षीय, विरोधक व सर्वसामान्य जनतेचा मी प्रतिनिधी आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती व ते तसे वागतसुद्धा होते. कुणाला तोडून न बोलणे, न रागावणे, रागावलेल्यांना शांत करणे, व्यवस्थितपणे आपला मुद्दा पटवून देणे ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर व पायाला भिंगरी हे प्रतिनिधीचे वर्णन म्हणजे दादा होते. त्यांच्या शांत स्वभावामुळे व कोणत्याही विषयातील अभ्यासामुळे अधिकारी वर्गसुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी व आदर बाळगून होता. कोणत्याही अधिकार्‍याशी ते कधी फटकून वागले नाहीत अथवा रागावले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे ‘न भूतो न भविष्यति’ असे घरगुती व सार्वजनिक प्रश्न त्यांनी सोडवले. अधिकार्‍यांनीसुद्धा दादांना कधी निराश केले नाही. दादांच्या संपर्कात आलेला कोणताही अधिकारी त्यांची ओळख विसरला नाही, तर नेहमी संपर्कात राहिला व भेटत राहिला. आजही कोणताही अधिकारी कनिष्ठ असो वा वरिष्ठ असो, दादांविषयी आदरानेच बोलतात. त्यांच्याविषयी वाईट बोललेले मला तरी आठवत नाही. अधिकार्‍यांशी व्यवस्थित संबंध ठेवून कामे कशी करवून घ्यावी, याचे धडे आजकालच्या राजकीय प्रतिनिधींनी दादांकडून घ्यायला हवेत. आपल्या फळीतील सहकारी कार्यकर्त्यांशी दादा अधिक संयमाने वागले. सर्वच्या सर्व सहकारी मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवले, त्यामुळे वितुष्ट आले नाही. त्यामुळे पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची मुळे खोलवर रुजली.
 
 
 
मजबूत पाया तयार झाला. यामध्ये बरेच सहकारी नि:स्वार्थपणे साथ देत राहिले. जिल्ह्यामध्ये आरक्षण आहे, हे माहिती असूनसुद्धा पदाची अपेक्षा न बाळगता, पक्षाशी एकनिष्ठ राहून पूर्णवेळ काम करत राहिले. याला अपवाद काही सहकारी असले तरी त्यामुळे पोकळी निर्माण झाली नाही अथवा पक्षावर परिणाम झाला नाही. अव्याहतपणे जनतेची सार्वजनिक व खासगी कामे झाल्यामुळे पक्षाशी संबंधित कार्यकर्ते तयार झाले. काही वेळेस सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न झाले. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपवादात्मक निवडणुका वगळता जनतेने त्यांना नाकारले व जातीयवादी राजकारण फार काळ टिकू शकत नाही, हेही अधोरेखित झाले. यामध्ये खरंतर दादांचा कस लागला होता. पण, तब्बल चार दशके समाजकारणात असल्याने दादांनी त्याला काहीही उत्तर न देता, कुणबी-आदिवासी संघर्षाचा अवघड चेंडू न खेळता विजयाचा षट्कार ठोकला होता. या खेळीने विरोधकांची बोटं तोंडात जाऊन ते तोंडघशी पडले होते. आक्रमक जातीयवादी राजकारणाला निष्प्रभ करवून गांधीगिरीने दादांनी उत्तर दिले होते. २०१४ मध्ये आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आल्यानंतर ती अधिक सक्षमपणे त्यांनी पेलली. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून समाजाच्या पुनरुत्थानाच्या अनेक योजना व संकल्पना आणल्या व यशस्वीपणे राबविल्या.
आदिवासी विकास विभागामध्ये बांधकाम विभाग सुरु करुन २५० हून अधिक आश्रमशाळांची अत्याधुनिक पद्धतीने बांधकामे झाली. कुपोषणाची तीव्रता कमी होऊन टक्का कमी झाला. वनवासी विद्यार्थ्यांनी हिमालय शिखर सर केले. ‘पेसा’ कायद्याची सर्वप्रथम अंमलबजावणी महाराष्ट्रात आदिवासी विभागात झाली. पाच टक्के सबंध निधी ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक कामांसाठी मिळू लागला. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत जवळ जवळ ५५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ज्याचे शुल्क आदिवासी विकास विभागाने भरले. गरमागरम जेवण विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून ‘सेंट्रल किचन’ निर्माण केले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ‘डीबीटी योजना’ आणून पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली. पालघर जिल्ह्यातीलच नव्हे, तर प्रत्येक आदिवासी मतदारसंघामध्ये दळणवळण सुलभ व्हावे म्हणून रस्त्यांचे जाळे निर्माण केले. मोठ्या पुलांची मंजुरी घेतली. केंद्राच्या मदतीने राज्यमार्ग निर्माण केले.
१९९४ साली केवळ आठ महिने कालावधी मिळाला असतानाही, आदिवासी आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये निर्माण करण्यात यश आले. तसेच ‘शबरी आदिवासी विकास महामंडळ’ स्थापन केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करुन व मार्गदर्शन घेऊन आदिवासी विकास विभागाचा गाडा रुळावर आणला. धनगर आरक्षण असो अथवा बोगस आदिवासी प्रकरणं, कोणत्याही बाबतीत त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. आपल्या मतांवर ठाम राहिले. एखादा राजकारणी उच्चपदावर असल्यावर आपली तत्त्वं बदलतो, पण दादा त्याला अपवाद होते, त्यामुळेच ते एवढा प्रदीर्घ काळ यशस्वीपणे निभवू शकले. सामान्यांतून असामान्य माणसे तयार होत असतात. परंतु, असामान्य होऊन सामान्यांसारखे राहावे, वागावे व ते टिकवणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण दादांनी जीवनभर आचरणात आणले. दादांच्या जीवनातील हे विविध पैलू उलगडताना आपल्याला त्यांची अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिड्.मूढ करतात व दिशा दाखवतात. पहाडाएवढी कामे करूनसुद्धा त्यांची जाहिरात न करणारा राजकारणी हा विरळाच. टीकाकारसुद्धा कालांतराने त्यांचे प्रशंसक होऊन जात असत. अशा शांत, संयमी, सोज्वळ, सालस, सौंदर्यपूर्ण वागणारा लोकनेता माझे वडील म्हणून आणि राजकीय गुरु म्हणून अतिशय श्रेष्ठ होते, यात शंका नाही. त्यांना कोटी कोटी भावसुमनांजली!!!
 
- डॉ. हेमंत सवरा
 
 
@@AUTHORINFO_V1@@