“देश पुन्हा चंपारण्यासारखा त्रास सहन करत आहे. आंदोलनातला प्रत्येक शेतकरी आणि मजूर सत्याग्रही आहे. ते आपला अधिकार घेऊनच राहतील.” हुश्श! बोललो एकदाचे. पण ‘चंपारण’ म्हणजे काय मला बिल्कूल विचारू नका. मम्मीला पण माहिती नसेल. ते अहमद अंकल होते ते काही अडले की सांगायचे. आता ते पण नाहीत. दिग्गी अंकलसुद्धा सध्या गायबच आहेत. मला असे ‘डायलॉग’ बोलायला लागतात. त्यात ते हिंदी शब्द. हिंदुस्तानी लोकांची नावं काय बरं ती! विशव्हसररररररर... च्छे! भलीमोठी विचित्र नाव ती घ्यावी लागतात. किती त्रास होतो. पण करावं लागतं. मम्मी म्हणते, “सोन्या (म्हणजे मी) लेकरा, तुला मोदींच्या नाकावर टि पंतप्रधान बनायचं आहे. पंतप्रधानपदाचे दावेदार फक्त आपणच आहोत. त्यामुळे झेपलं नाही तरी बोलत राहा.” हं! गेल्यावर्षी चांगली संधी होती असे वाटले होते. ‘सीएए’चा आयता बहाणा होता. सोप्पं आहे. काडी लावायची आणि आपण जायचं पळून लांब, आजीच्या घरी. तेथून गंमत बघत बसायची. करा तिकडे तुम्हाला काय करायचे ते! आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. चांगलीच आग लावली. पण काही झालं नाही. कोरोना आला. माझ्या आज्जीच्या गावी तर कोरोनाने हाहाकार केला. तेव्हा मला वाटले होते की, आमच्या आज्जीचा देश स्वच्छ, सुंदर आणि तसा थोडा श्रीमंतच. इथे कोरोनाने सगळ्यांना हादरवून सोडले. भारतात तर कोरोना काय करेल, विचारायलाच नको. म्हणून मी म्हणालोही की, बघा भारतात कशी त्सुनामी येईल ती. पण हाय रे दैवा, अल्ला, जिझस, वाहे गुरू (आम्ही सेक्युलर आहोत, सगळ्यांना खूश ठेवतो) भारताने तर कोरोनाही पचवला. नंतर उत्तर प्रदेशमध्ये पण आमच्यासाठी चांगली घटना घडली. हाथरसमध्ये वाल्मिकी समाजाची मुलगी अत्याचारात वारली. आम्ही तुफान खूश झालो. माझी तायडी आणि मी धावतपळत तिकडे गेलो. मी तर पडण्याचे नाटक पण केले. पण तिथेही हाती काही लागले नाही. आता शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन सुरू आहे. लोक म्हणतातकी, हे आंदोलन खोटे आहे. देशाला तोडणाऱ्या लोकांचे आहे. पण त्यांच्याशी मला काय देणे-घेणे नाही. देशाचे कल्याण, देशाची सुरक्षाबिरक्षा त्याचे कंत्राट मोदी आणि भाजपचे. आम्हाला तर फक्त सत्ता पाहिजे. आमचे आहे ‘मिशन सत्तेचा मलिदा’!
२०२४ पुन्हा रडा आणि कुढा
अडाणी, निरक्षर आणि स्पृश्य-अस्पृश्यता पाळणाऱ्या राज्यातील लोकच करतात भाजपला मतदान, असे शशी थरूर यांचे म्हणणे आहे. तेच शशी थरूर ज्यांचे म्हणणे आहे की, जगातल्या प्रत्येक शहरांमध्ये त्यांना गर्लफ्रेंड आहे. अर्थात, कोणाला किती गर्लफ्रेंड असाव्यात हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे. मात्र, ज्यांच्यावर सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत संशय आहे, अशा घटनांमध्ये शशी थरूर यांची कृती अजिबात वैयक्तिक नाही. स्वत:च्या पत्नीच्या हत्येबाबत संशयित असलेले शशी थरूर यांची सामाजिक संवेदनशीलता किती असावी, याबाबत न बोललेलेच बरे. तरीही ज्या राज्यात भाजप जिंकते आहे त्या राज्यातील लोकांना अडाणी, निरक्षर आणि स्पृश्य-अस्पृश्यतेचा गुन्हा करणारी लोक आहेत, असे म्हणणे म्हणजे भाजपशासित राज्य सरकारचा आणि त्या राज्याचा अपमानच आहे. देशात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या राज्यातच काँग्रसचे राज्य आहे. प्रामुख्याने दक्षिण भारत सोडला, तर उर्वरित भारतात भाजपची प्रचंड स्वीकार्हता आहे. मात्र, आता सध्या दक्षिण भारतामध्येही भाजपची लाट सुरू झाली आहे. ज्यांना भाजपचा इतिहास माहिती आहे त्यांना माहितीच असेल की, दक्षिण भारतातही भाजपची लाट ही त्सुनामी बनून दक्षिणेतही खंबीर पाय रोवेल. अर्थात, हे शशी थरूरसारख्यांना माहिती नसेल असे नाही. पण भाजपला रोखता येत नाही. शशी यांच्या पक्षाचे ‘हायकमांड’ लोकांना भडकवण्यासाठी, देशात अस्थिरता माजवून मोदींची आणि भाजपची लोकप्रियता कमी करण्यासाठी काही ना काही करत असतात. पण त्याला काही फळ येत नाही. त्यामुळे मग जे लोक भाजपला मत देतात, त्यांचीच निंदा करण्याचे काम शशी थरूर यांनी सुरू केले आहे. शशी आणि त्यांच्या बोलवत्या मालकांना कधी कळणार की, भारतात लोकशाही आहे. लोकांच्या भावनेचा आदर करायला हवा. जनता जनार्दनच राजा आहे. त्यांचा अपमान करून तुम्ही स्वत:चे समाधान करत आहात. पण हे समाधान खरूज असल्यावर खाजवण्यासारखे आहे. ज्या जनतेला तुम्ही अडाणी, निरक्षर आणि स्पृश्य-अस्पृश्य मानणारे गुन्हेगार ठरवलेत, ती जनताच पुन्हा २०२४ साली भाजपला जिंकून आणीन. तेव्हाही तुम्ही असेच रडत कुढत बसा.