"हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान" असं म्हणत स्वीकारलं पद
नाशिक: ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने अध्यक्षपदासाठी वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. आणि या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाली आहे. स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांची भेट घेऊन सन्मान केला.
स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देतांना छगन भुजबळ म्हणाले की, "नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड, माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव्य केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर यांची निवड केली आहे. अशा या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण माझी निवड केलीत" माझ्यासाठी मी सर्वोच्च असा सन्मान समजतो.
त्याचप्रमाणे "नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल. यात कुठलीच शंका नाही. नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्विकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्विकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल, असा विश्वास व्यक्त करतो" असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.