मुंबई:महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे वनवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. शुक्रवारी भोसरी येथे आयोजित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
चंद्रकांतदादा म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. नवीन सरकारमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलन केली पाहिजेत. सध्या राज्यातील वसतीगृहातील भीषण अवस्था झाली आहे. डी.बी.टी.च्या माध्यमातून वनवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे जमा केले जातात, त्यामध्ये गोंधळ सुरू आहे. काहींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्यांचा लाभ मिळवला आहे. त्यामुळे असे प्रश्न शोधून त्यावर आंदोलन उभारुन सरकारचं लक्ष वेधले पाहिजे.
तसेच दादा पुढे म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना वनवासी समाजाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने 25 हजार वनवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांची सर्व फी आपण भरली. त्यासोबतच वनपट्टे वनवासी बांधवांना मिळवून दिले. त्यासाठीचा जो कायदा होता, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या सर्व कामांची माहिती कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तसेच भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवेल, अशी घोषणाही यावेळी पाटील यांनी केली.