राज्यात किमान तापमानाचा पारा उतरणार
मुंबई - राज्यात उद्यापासून म्हणजेच २० जानेवारीपासून तापमानाचा पारा उतरणारा असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या २४ तासांमध्ये वातावरण पुन्हा कोरडे होऊन किमान तापमानामध्ये घसरण होऊ शकते. येत्या काही तासांमध्ये मुंबईत किमान तापमानाचा पारा १८, तर त्यानंतरच्या २४ तासांमध्ये पारा १७ अंशांपर्यंत खाली उतरेल अशी शक्यता आहे.
मुंबईमध्ये सोमवारी कुलाबा येथे २१.८, तर सांताक्रूझ येथे २०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईत अजूनही हवी तशी थंडी मुंबईकरांना जाणवलेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांमध्ये तापमानाचा पार उतरठणार आहे. २० जानेवारीपासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणामध्ये थंडी जाणवणार आहे. २२ तारखेनंतर पुणे, नाशिक येथील किमान तापमानाचा पारा १२ अंशांखाली जाईल, तर मुंबई परिसरातही १६ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद होईल. ही माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
कच्छमध्ये १९ आणि २० जानेवारीला शीत लहरी जाणवतील. याचा परिणम उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवेल. किमान तापमानामध्ये होणारा हा बदल जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत राहण्याचा अंदज आहे. कोकण विभागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा खूप फरक नसेल.