औरंगाबादमधील पाटोद्यात अनुराधा पेरे- पाटील पराभूत
औरंगाबाद: आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात आले आहे. तब्बल २५ वर्षांनंतर गावात सत्तांतर झाले आहे. आज ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांची तब्बल २५ वर्षांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. खरंतर भास्कर पेरे-पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. परंतु त्यांचा पराभव झाला आहे.
भास्कर पेरे-पाटील यांचं तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. व यामध्ये यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.
अनुराधा पेरे-पाटील यांच्याविरोधात उभे असणाऱ्या दुर्गेश खोकड यांना २०४ मतं मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना १८४ मतं मिळाली. सलग २५ वर्ष सत्तेत असलेल्या पेरे-पाटील यांनी पाटोदा गावाचं रूपडं बदललं, गावाला आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली. मात्र त्याच गावात त्यांच्या मुलीचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे 'भास्कर पेरे-पाटील यांना देखील गावात पराभव होण्याची कुणकुण लागली होती का? ज्यामुळे त्यांनी माघार घेतली' अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.