'राज्य कारभारात लक्ष घाला फुकाचे सल्ले देणं बंद करा'

    11-Jan-2021
Total Views |

atul bhatkhalkar_1 &

मुंबई : भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणामुळे झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूनंतर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लागवत प्रत्युत्तर दिले.

"उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे," असे म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. "इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील." असं भातखळकर म्हणाले.




पुढे व्हिडीओ ट्विट करत भातखळकर म्हणतात,"बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी सामनातून आज सल्ला दिलाय की मोदीजींनी नेहरूंसारखं वागावं. नेहरूंनी ज्याप्रमाणे काश्मीरचा विचका केला, चीनसमोर शरणागती पत्कारली तशी मोदीजींनी करावं असं संजय राऊत यांचं म्हणणं दिसतंय. पंतप्रधान नेहरू होते म्हणून देशाच्या आरोग्यव्यवस्थेची वाट लागली. ७० वर्षांनंतर प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदींना पहिले टॉयलेट बांधायचं काम हाती घ्यावं लागलं. त्यामुळे मुंबई महापालिकेत काय होतंय आणि महाराष्ट्रात काय घडतंय यावर लक्ष द्या,"असा इशारा भातखळकर यांनी संजय राऊत यांना दिला. पुढे ते म्हणतात,"मुंबई महापालिकेत गेली २० वर्षे तुमची सत्ता आहे. तिकडे ४० हुन अधिक रुग्णालये बेकायदेशीरपणे काम करत आहे. सात रुग्णालयाचे फायर ऑडिट झालं नाहीये. त्यामुळे मोदीजी आणि अमित शहांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते बघा. नशीब देवेंद्रजी भंडाऱ्याला गेल्यानंतर घरबश्या मुख्यमंत्र्यांना नाईलाजास्तव भंडाऱ्याला जावं लागलं आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विट केल्यांनतर मग १० मिनिटांनी ट्विट करावंसं वाटलं. त्यामुळे राज्य कारभारात लक्ष घाला फुकाचे सल्ले देणं आता बंद करा," असे म्हणत त्यांनी संजय राऊत व शिवसेनेचा समाचार घेतला.