पाकच्या माजी राजनैतिक अधिकार्याची कबुली
इस्लामाबाद: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात भारताकडून करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये (हवाई हल्ला) सुमारे ३००हून अधिक जण ठार झाले, अशी कबुली पाकिस्तानच्या एका माजी राजनैतिक अधिकार्याने दिली आहे. पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीसोबतच्या चर्चेदरम्यान ही कबुली दिली आहे.
२६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोट हवाई हल्ल्यात ३०० हून अधिक जण ठार झाले होते, असे त्यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले असून याचा बदला पाकिस्तानी सैन्यानेही घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. ते म्हणाले, “भारताच्या हवाई हल्ल्यात ३०० पेक्षा अधिक जण ठार झाल्याचे सांगितले जाते. पण आमचे लक्ष्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हाय कमांडला लक्ष्य करतो. तेच आमचे योग्य लक्ष्य आहेत. कारण ते सैन्यातील जवान आहेत. ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे आपण भारताला सांगितले होते. पण आता भारताच्या कुठल्याही कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे,” असे आगा हिलाली म्हणाले.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने हा हवाई हल्ला केला होता. ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान ठार झाले होते. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. त्यानंतर भारताने दि. २६ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कारवाई केली होती.