मुंबई : बर्फ फ्लूबद्दल अनेक चर्चा होत असताना दररोज देशात काही ठिकाणी पक्षी मृत पावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. राज्यात मात्र, असा कुठलाही विषाणू आढळलेला नाही. एकाही पक्षाचा राज्यात बर्डफ्ल्यू मुळे झाल्याचे आढळलेले नाही. अंडी व कुक्कुट मांस (चिकन) ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवल्यास विषाणू निष्क्रीय होतो.
त्यामुळे अंडी व पोल्ट्री मांस खाणे पूर्णतः सुरक्षित आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील छत्रपाल केदार यांनी दिली आहे. तसेच राज्यात चिकन-अंडी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आले नाहीत, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राज्यात पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास, व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त मृतक झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
राज्यात बर्डफ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नयेत काही समस्या असल्यास पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.