नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |

air pollution _1 &nb


हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' स्तरावर


मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसलेला दिसतोय. तापमानात घट झाल्याने वातावरणात वाढलेल्या आर्दतेमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. कालपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी 'अत्यंत वाईट' स्तरावर नोंदविण्यात येत आहे.
 
 
 
राज्यात थंडीचा पार वाढल्यापासून हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईत १५ अंशापर्यंत, तर नाशिक-पुण्यात ५ ते ६ अंशापर्यंत तापमान उतरले आहे. तापमानातील बदलाचा हा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे वायू प्रदूषणातील वाढीमध्येही सातत्य राहण्याची शक्यता आहे. हवेमधील २.५ पीएम हे कण प्रदूषणास कारक असतात. उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने हे प्रदूषित कण हवेसोबत उंचावर वाहून जातात. मात्र, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी धूलीकण जमिनीलगतच राहतात. परिणामी हिवाळ्यात धूर आणि धूक्यांचे मिश्रण होऊन धूरके तयार होते. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते.

 
  
गेल्या काही दिवासांपासून मुंबई, पुणे आणि नाशिकच्या तापमानाचा पारा उतरू लागल्यावर तेथील हवेची गुणवत्ताही ढासळत असलेली पाहावयास मिळाली आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या 'सफर' या अॅपमधील आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक शहराची सकाळची गुणवत्ता ही 'अंत्यत वाईट' स्तरावर नोंदविण्यात आली आहे. मुंबईत मंगळवारी रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. तेव्हापासून गेले तीन दिवस मुंबईतील रात्रीचे तापमान १५ ते २० अंशादरम्यान नोंदवले जात आहे. त्यामुळे काल आणि आज मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काल मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण निर्देशांक ३२० नोंदवण्यात आला होता. आज या निर्देशांकात सुधारणा होऊन तो ३०२ वर येऊन स्थिरावला आहे. शहरात बीकेसी, चेंबूर, माझगाव या भागात हवेची गुणवत्ता 'अंत्यत वाईट' स्तराची आहे. यामध्ये बीकेसीतील हवेमधील पीएम २.५ कणांचा निर्देशांक ३५५ आहे. 
 
 

@@AUTHORINFO_V1@@