मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि महाराष्ट्र सरकार हा वाद काय आता नवीन नाही. अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन ते तिच्या घरावरील बीएमसीची कारवाई या सगळ्यावर तिने नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पुन्हा एकदा तिने “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत.” अशी टीका केली आहे. तसेच तिने साहिल चौधरीला अटक केल्यानंतर ट्विट करत काँग्रेसला सवाल देखील केला आहे. तर मुंबईत गुंडराज चालू असल्याचा देखील आरोपी कंगनाने केला आहे.
महाराष्ट्र सरकारवर हरियाणातील युट्यूबर साहिल चौधरीने टीका केली होती. याप्रकरणी साहिल चौधरीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर कंगनाने टीका केली आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मुंबईत हा गुंडाराज चालला आहे? जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्या टीमाला कुणीही प्रश्न विचारू शकत नाही? त्यांनी आमच्यासाठी काय केले? आमची घरे तोडली आणि आम्हाला मारले? यासाठी उत्तरदायी कोण आहे?” असा प्रश्न तिने काँग्रेसला केला आहे.