नवी दिल्ली : मागील सहा महिन्यांपासून देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल एक लाख रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर कालच्या दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले आहेत.
देशात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८०.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १.६० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १८.२८ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबरपर्यंत देशात सहा कोटी ५३ लाख, २५ हजार ७७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार, १८५ नमुन्यांची चाचणी ही सोमवारी करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख, ६२ हजार ६६३ एवढी झाली आहे. तर या २४ तासांत एक हजार ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८८ हजार ९३५ एवढा झाला आहे. मात्र या सर्वामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे भारतामध्ये काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे.