मुंबई : राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून मुंबईतील अनेक कार्यालये पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत. मात्र अद्यापही सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वेप्रवास सुरु न झाल्याने उपनगरातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील लोकल रेल्वेसेवा सुरु करावी अशी मागणी केली. मात्र सरकारकडून यावर कोणतीही स्पष्टता दिली जात नसल्याने मनसे आक्रमक होताना दिसत आहे.
मनसेने येत्या सोमवारी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, "लॉकडाउनच्या काळात रेल्वेसेवा पूर्ण बंद आहे. सध्या बससेवा सुरु आहे मात्र लोकांचे यात प्रचंड हाल होत आहेत. लोकांना आठ तास प्रवास करावा लागतो आहे. या लोकांचे हाल बघवत नाहीयेत. आम्ही वारंवार सरकारकडे रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी करत आहोत. त्यामुळे पालघर, अंबरनाथ, कल्याण येथून येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.विनंती करूनही सरकार ऐकत नाहीयेत त्यामुळे येत्या सोमवारी मनसे सविनय कायदेभंग करणार आहोत. जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वेप्रवास!"
दरम्यान काही दिवसांपूर्वी बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. लोकल सुरु न केल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.लोकल लवकर सुरु करा अशी मागणी विशेषतः उपनगरात राहून दररोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे.