मराठा समाज आंदोलन करेल याची राज्य सरकारला धास्ती!
मुंबई : कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत मुंबईत मध्यरात्रीपासून पुन्हा कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली. याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कारण जरी पुढे करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मात्र खरे कारण वेगळे असल्याचा संशय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
ट्विटरद्वारे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'मराठा आरक्षण संदर्भात आपण अपयशी झालो आहोत हे राज्य सरकारला माहित आहे आणि म्हणूनच मराठा समाज हा या असंतोषातून आंदोलन करेल याची भीती राज्य सरकारला वाटत असावी आणि म्हणून कोरोनाचे कारण पुढे करत राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी लागू केली.'
'मराठा समाजाचा आवाज पूर्णपणे दाबून टाकण्यासाठी महाभकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेच्या मोहा पलीकडे काही दिसत नाही. परंतु मला राज्य सरकारला हे सांगायचे आहे तुम्ही कितीही मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तरी तो बंद होणार नाही. पण, क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही,' असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.