मनोरंजनाच्या अवकाशातील ‘रोहिणी’ नक्षत्र!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020   
Total Views |

Rohini _1  H x




‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबा गांधींची भूमिका साकारत त्यांनी सगळ्यांची वाहवा मिळवली. हिंदी-मराठी-गुजरातीसह इतर भाषिक नाटकं आणि चित्रपट गाजवणार्‍या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याविषयी...
 
 
अनेकांच्या आयुष्यात काही न काही योगायोग असतात. रोहिणीताईंच्या आयुष्यातही असाच एक मोठा योगायोग आहे. ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका अजरामर करणार्‍या रोहिणीताईंची आणि कस्तुरबांची जन्मतारीख एकच! या भूमिकेनेच त्यांना चित्रपट जगतात ओळख मिळवून दिली. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची सगळीकडेच वाहवा झाली.
 
 
दि. ११ एप्रिल, १९५१रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंत ओक, तर आईचे नाव निर्मला ओक. आईवडील आणि बंधू रवींद्र ओक तिघेही अभिनयक्षेत्रात कार्यरत होते. अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने रोहिणीताईंना बालपणापासूनच अभिनयात रुची होती. रेणुकास्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल, पुणे येथे त्यांनी शिक्षण घेतले. शाळेत असल्यापासूनच त्या विविध नाट्यस्पर्धांत भाग घेत असत. पुढे त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.एस्सी पदवी संपादन केली. नवी दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ अर्थात ‘एनएसडी’ येथे त्यांनी १९७१ पासून तीन वर्षांचे अभिनय प्रशिक्षण घेतले. भरतनाट्यम् व कथकली या अभिजात भारतीय नृत्यप्रकारांचे सुरेंद्र वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले.
 
 
‘एनएसडी’तून शिक्षण घेतलेल्या रोहिणीताईंचे गुरू होते इब्राहीम अल्काझी! रोहिणीताईंच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवर झाली. अभिनय प्रशिक्षण कालावधीत त्यांनी विविध भाषांमधील नाट्यप्रयोगांमध्ये निरनिराळ्या भूमिका केल्या. त्यांत विख्यात हिंदी-उर्दू कादंबरीकार प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ या कादंबरीवर आधारित ‘होरी’ या नाटकातील ‘धनिया’, कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोकनाट्यातील ‘भीष्मविजय’मधील ‘अंबा’, ‘इबारगी’ या जपानी ‘काबुकी’ पद्धतीच्या नाटकातील ‘मावशी’, ‘अंधायुग‘मधील ‘गांधारी’ इत्यादी त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
 
 
‘एका म्हातार्‍याचा खून’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. प्रशिक्षण काळात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी, असे सन्मानही प्राप्त झाले. स्पॅनिश नाटककार फेथेरीको गार्सीआ लोर्का यांच्या ‘येर्मा’ या नाटकाचा मराठी अनुवाद ‘चांगुणा’ या नाटकामधील त्यांच्या भूमिकेला १९७५ सालचा महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. जपानी ‘काबुकी’ नाट्यप्रकारामध्ये, तसेच कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोकनाट्यप्रकारामध्ये काम करणार्‍या त्या पहिल्या आशियाई महिला होत्या.
 
 
‘एनएसडी’मध्ये असताना त्यांची जयदीप हट्टंगडी यांच्यासोबत ओळख झाली. २८ मे १९७७ रोजी रोहिणी यांनी जयदीप यांच्याशी लग्नगाठ बांधली. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत दोघांनी एका मराठी थिएटर ग्रुपची सुरुवात केली. या ग्रुपने १५०हून अधिक नाटकांची निर्मिती केली. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधूनच जयदेव यांनी दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले. पुढे प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ते नावाजले गेले.
 
 
रामदास भटकळ यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या ‘जगदंबा’ या नाटकाच्या एकपात्री प्रयोगात रोहिणीताईंनी कस्तुरबांची केलेली भूमिका लक्षणीय होती. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकातील त्यांची मुरळीची भूमिकाही लक्षवेधी ठरली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ‘कस्तुरीमृग’, ‘लपंडाव’, ‘लफडासदन’, ‘डंख’, ‘मित्राची गोष्ट’, ‘रथचक्र’ आदी नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या. मराठी-हिंदीच नव्हे, तर त्यांनी गुजराती व्यावसायिक नाटकांमधूनही भूमिका वठविल्या.
 
 
‘सर्पनाद’, ‘अमे जीविये बेफाम’, ‘माणस होवानो मनेडंख’, ‘तहोमत’ अशी गुजराती नाटके त्यांच्या भूमिकेने गाजली. जयदेव व रोहिणी यांनी प्रयोगशील नाटके सादर करण्यासाठी मुंबई येथे ‘कलाश्रय’ ही संस्था काढली. नितीन सेन यांच्या बंगाली कथेवर आधारित ‘अपराजिता’ हा जयदेव दिग्दर्शित एकपात्री प्रयोग आणि त्यातील रोहिणी यांची भूमिका अतिशय गाजली. हिंदी व मराठीमध्ये त्याचे अनेक प्रयोग झाले.
 
 
 
१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ या चित्रपटाद्वारे रोहिणीताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘चक्र’, ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘अग्निपथ’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अपत्यवियोगाचे दु:ख भोगणार्‍या वयस्क जोडप्याची कथा असलेल्या ‘सारांश’ या चित्रपटातील जोडप्यामधल्या पत्नीची संस्मरणीय भूमिका रोहिणीताईंनी केली. कन्नड ‘मनेसूर्या’, मल्याळम् ‘अच्युवेत्तन्ते वीडु’ आणि ‘अग्निदेवता’, तेलुगू ‘सीतारामय्यगारी मनवरालु’, तामिळ ‘वसूल राजा एमबीबीएस’ असे दाक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट त्यांनी केले. छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’, ‘होणार सून मी या घरची’ या रोहिणीताईंच्या मालिका प्रचंड गाजल्या. त्यामधल्या त्यांच्या सासूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले. सध्या ‘डॉक्टर डॉन’ मालिकेतील त्यांची भूमिकाही खूप गाजते आहे.
 
 
अभिनय कारकिर्दीत रोहिणी हट्टंगडी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राज्य-नाट्यस्पर्धेमध्ये चार वेळा प्रमाणपत्र, रौप्यपदक, ‘कस्तुरीमृग’ या व्यावसायिक नाटकातील भूमिकेकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार, ‘अर्थ’ आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड, ‘पार्टी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अ‍ॅवॉर्ड, विष्णुदास भावे पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांचा ‘गांधी’ हा चित्रपट ‘ऑस्कर’साठी निवडला गेला. या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेसाठी ‘ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स’तर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@