केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची राज्यसभेत माहिती!
नवी दिल्ली : भारतामध्ये दिवसाला सुमारे ९० ते ९५ हजारांच्या घरात नव्या रूग्णांची भर पडत असताना आता देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५१ लाखांच्या पार गेली आहे. अशावेळी प्रत्येक भारतीयाला कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लस कधी येणार? हा प्रश्न पडला आहे. मात्र त्यावर आज देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी माहिती दिली आहे.
राज्यसभेत बोलताना त्यांनी 'इतर देशांप्रमाणेच भारतदेखील कोविड-१९ वरील लसीवर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ समिती काम करत आहे. आमच्याकडे आगामी काळाचे नियोजन आहे. आम्हाला विश्वास आहे की २०२१च्या सुरूवातीस भारतामध्ये कोरोना विषाणू नष्ट करणारी लस उपलब्ध होऊ शकते', असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, कोणाला लस दिली जाईल, कशी दिली जाईल याचा कार्यक्रम ठरला आहे. दहा टप्प्यांची आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
भारतात गेल्या २४ तासात १ हजार १३२ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले असून, आतापर्यंत ८३ हजार १९८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४० लाख २५ हजार ०८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दहा लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण देशात आहेत.