मुंबई : मुंबई महानगर पालिकेने अभिनेत्री कंगणाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. पालिकेच्या या कारवाईवरून विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. याच संदर्भात ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतिहासातीळ सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावे,” असे म्हणत भाजपचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात ‘अयशस्वी’ मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावे. तसेच, शिवसेनेने आपले नाव बदलून ‘बाबर सेना’ करावे.” असे टीकास्त्र सोडले. पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील, हे देशाच्या जनतेला माहीत नव्हते. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका पक्षपाती कारवाई करत आहेत. ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशाऱ्यावरूनच होत आहे.” असे म्हणत महाराष्ट्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.