मुंबई : कोरोना लॉकडाउनच्या काळात नागरिकांना अवाजवी वीजबिले पाठविल्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष भाजपने राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे. महावितरणकडे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाहीत, वीज खरेदी करायला पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी असे कारस्थान रचले असल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आम्ही राज्यातील २० ठिकाणांहुन प्रातिनिधिक स्वरूपात १०० बिले एक नमूना म्हणून आणली आहेत. या वीजबिलांचा आम्ही बारीक अभ्यासही केलाय. लॉकडाऊनमध्ये वीजदर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी २० टक्क्यांनी वीजदर वाढवले आहे. राज्य सरकार लोकांची दिशाभूल करुन लूट करत आहेत. हे सरकार लोकांना मूर्ख बनवत आहे. सरासरी बिले द्यायची हा या सरकारने घोषित केलेला निर्णय होता. मात्र, प्रत्येक्षात वेगळेच आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ४० टक्के मीटर रीडिंग घेतलीच नाहीत, आमच्याकडे अशी १०० वाढीव वीज बिले आहेत, ही बिलं आम्ही उर्जामंत्र्यांकडे पाठवणार आहोत आणि राज्यपालांनाही भेटणार आहोत, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. महावितरण सोबत बेस्ट, अदानी, टाटा यांनी पण जर वाढीव बिल पाठवली असतील तर त्यांनाही जाब विचारणार असल्याचे सोमय्या म्हणाले. जुलै महिन्याचा मीटर रीडिंगला स्थगिती द्यावी, तसेच चुकीची बिले पाठवली म्हणून राज्य सरकारने माफी मागावी आणि खोटी बिले पाठवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.