नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी मात्र, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे. सुशांत सिंह प्रकरणाच्या बिहार पोलीसांच्या तपासावर राहुल गांधी व बिहारचे काँग्रेस नेते समाधानी असल्याचीही माहिती आहे.
राहुल गांधी यांनी आगामी बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सहकारी पक्ष व नेत्यांशी व्ही़डिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद केला. या बैठकीत बिहारच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारवरही यावेळी टीका करण्यात आली. जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर सुरू असलेल्या या बैठकांमध्ये सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरही चर्चा झाली. यात काँग्रेसचे बिहारमधील नेते हे बिहार पोलीसांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे दिसून आले.