श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वेसू गावचे भाजप सरपंच सज्जाद अहमद यांच्यावर गुरुवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात त्यांना ५ गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सज्जादच्या घराबाहेरच दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला.
भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्याची ४८ तासांमधली ही दुसरी घटना आहे. ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहशतवाद्यांनी कुलगामच्या मीर बाजारात भाजपचे सरपंच आरिफ अहमद यांना गोळ्या घातल्या ते गंभीर जखमी झाले. ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले. यामुळे दहशतवादी वातावरणात तणाव निर्माण करू शकतात, अशी माहिती श्रीनगर प्रशासनाला मिळाली होती, म्हणूनच ४ आणि ५ ऑगस्ट रोजी श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला. दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात बारामुल्ला जिल्ह्यातील भाजप नेते मिराजुद्दीन मल्ल यांचे अपहरण केले होते. यापूर्वी दहशतवाद्यांनी बंदीपोरा येथील भाजप नेते वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. वसीम बांदीपोरा जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष देखील होते.