सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरील प्रसिद्धीपत्रकावरुन भाजप आमदार अतुल भातखळकरांचा सवाल!
मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरील प्रसिद्धीपत्रकावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ या विधानाचा अर्थ काय? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
राज्य मंत्रीमंडळातील सदस्याने ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे ते धमकी देत आहेत का? असा अर्थ लोकांनी घ्यायचा का? असाही प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची आवश्यकता आहे, कारण राज्यमंत्रीमंडळातील आपल्याच एका सहकार्यावर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? त्यामुळे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर याला जबाबदार कोण?, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत असे पत्रकात म्हटले गेले आहे. परंतु ५० दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास कसा करत आहेत? याची माहिती मंत्री महोदयांनी जनतेला द्यावी, असे भातखळकरांनी म्हंटले आहे.
या चर्चेच्या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली का पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कारण कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत, असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे ज्ञान आदित्य ठाकरे यांना कुठून प्राप्त झाले हे जनतेस कळणे आवश्यक आहे. याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावले आपण उचलू, असेही आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.