मुंबई : एकीकडे बीसीसीआयच्या आयपीएल २०२० आयोजनचा मार्ग कुठे मोकळा होतो, तोवर आता आयपीएलवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे प्रायोजकत्व चीनी कंपनी विवोकडे कायम ठेवले आहे. यामुळे आयपीएल तसेच बीसीसीआयला भारतीय जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे हे पाऊल आयपीएल २०२०च्या अंगलट येण्याची शक्यता आहे. याशिवाय या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे.
स्वदेशी जागरण मंचने केले बहिष्काराचे आवाहन
‘आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये होत आहे. तर, दुसरीकडे आयपीएलने चीनी कंपनीचे प्रायोजकत्व कायम ठेवून गलवान संघर्षामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे,’ अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने केली आहे. ‘सद्यस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था बाजारातील चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकत आहे. चीनी गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना भारतामध्ये प्रवेश नाकारला जात आहे. अशामध्ये आयपीएलचे हे कृत्य देशाच्या सुरक्षेचा अपमान करणारे आहे,’ असे त्यांनी म्हंटले आहे.