मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचे स्वरूप आहेत; भूमिपूजनानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया
अयोध्या : आज अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी एक ट्विट करत प्रभू रामाच्या अनेक गुणांचे वर्णन केले आहे.
'मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचे स्वरूप आहेत. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाहीत. राम करुणा आहेत. ते कधी क्रूरतेत प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,' असे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हेदेखील उपस्थित होते.