सर तुम्ही ते राहूद्या वडिलांना हे प्रश्न विचारून बघा ! : कंगना रणौत
मुंबई : सरकारमधील एका युवा मंत्र्याचा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून वेळोवेळी करण्यात आला. मुंबई पोलीसांच्या चौकशीवर दबाव येत असल्याचेही भाजपने म्हटले होते. याला उत्तर देताना माझ्याविरोधात गलिच्छ राजकारण केले जात आहे, ठाकरे सरकारची लोकप्रियता अनेकांना खुपत आहे, असे प्रत्युत्तर युवा सेना प्रमुख व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. गलिच्छ राजकारणाबद्दल कोण बोलत आहे, तुमचे वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले ते विचारा, हा देखील एक गलिच्छ राजकारणाच्या केस स्टडीजचा प्रकार आहे असा टोला अभिनेत्री कंगना रणौतने आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मी संयम बाळगला आहे, असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना कंगनाने काही मोजक्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे म्हणत जाब विचारला आहे. टीम कंगना रणौत या तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे तिने हा प्रश्न केला आहे. "सर हे सर्व सोडा, तुम्ही तुमच्या वडिलांना खालील प्रश्न विचारा, १. रिया चक्रवर्ती कुठे आहे?, २. सुशांतच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलीसांनी एफआयआर दाखल का केली नाही? ३. फेब्रुवारीतच सुशांतच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती पोलीसांना मिळाली होती, तर सुशांतने आत्महत्या केली हे सांगायची घाई मुंबई पोलीसांनी का केली, ४ फॉरेन्सिक रिपोर्ट किंवा सुशांतच्या मोबाईलमधील माहिती का नाही ? ५ मृत्यूपूर्वी सुशांत कुणाकुणाशी काय बोलला ? ६. क्वारंटाईनच्या नावाखाली बिहार पोलीसांनी विनय तिवारी यांना डांबून का ठेवले ?"
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून दररोज नवे खळबळजनक आरोप होत आहेत. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात या सर्न्दर्भात माहिती दिली. पटना येथे दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सर्व पक्षांना हे प्रकरण हस्तांतरित करण्याच्या मागणीवर तीन दिवसांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. एका आठवड्यानंतर पुन्हा या खटल्याची सुनावणी होणार आहे.