नवी दिल्ली : भारत चीन सीमा तणाव निवळेनासा झाला आहे. चीन हे प्रकरण थंड होऊ देत नसल्याचे ड्रॅगनची वळवळ सांगत आहे. चीनने लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोलच्या (एनएसी) आजूबाजूला फाईव्ह जी सेवा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सैनिकांना बँरक आणि अन्य सोयी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
डेमचोकमध्ये 5G इन्फ्रास्ट्रक्चर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून वादग्रस्त भागात डेमचोकमध्ये 5G इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी करत आहे. चीनतर्फे या भागात ऑप्टीकल फायबरचे जाळे विणले जात आहे. याशिवाय अन्य कामांनीही जोर धरला आहे. इथे नवे शेड तयार करण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यासाठी पाच वेळा लष्करी आणि राजकीय पातळीवर चर्चा झाली होती.
चार महिन्यांपासून सुरू आहे तणाव
सीमा विवादामुळे भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाला चार महिने उलटून गेले आहेत. गलवान व्हॅली आणि पेट्रोलिंग पॉइंट (पीपी) १५ येथून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पैंगॉन्ग सो आणि गोगरा- हॉट स्प्रिंग या भागातही चीनी सैन्य अडून आहे. चीन पैगॉन्ग सो येथे फिंगर-५ आणि फिंगर-८ या भागात वारंवार आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आताही चीन पुन्हा याच भागात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
गलवान खोऱ्यातील तणावानंतर परिस्थिती बिकट
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये १५ जून रोजी झालेल्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. चीनचेही एकूण ३५ सैनिक मारले गेले मात्र, त्याची कबुली चीनने कधीच दिले नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनशी चर्चा केल्यानंतर चीनी सैन्य मागे हटेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, चीनच्या कुरापती या न त्या मार्गाने पुन्हा सुरू आहेत.