रोजगार, आरक्षण आणि राजकारण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


Reservation_1  
 


प्रत्येक राज्यात ’उद्योगस्नेही’ वातावरण निर्माण करणे हेही गरजेचे आहे. हे सर्व करण्याऐवजी आपली राज्य सरकारं नोकर्‍यांतील आरक्षणाचा टक्का वाढवण्याचा साधा सोपा मार्ग चोखाळतात.


भारतासारख्या गरीब देशांत ‘रोजगार’ त्यातही ‘शासकीय रोजगार’ हा मुद्दा नेहमीच संवेदनाक्षम राहिला आहे. भारताने १९९१ साली स्वीकारलेल्या नव्या आर्थिक धोरणानंतर आणि आता कोरोना काळात सरकारने या संदर्भात दोन दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. यातील पहिला म्हणजे केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात जाहीर केले की सरकारी, निम्न सरकारी नोकर्‍यांमध्ये भरतीसाठी राष्ट्रीय पातळीवर एक संस्था स्थापन केली जाईल व ती म्हणजे ‘नॅशनल रिक्रुटिंग एजन्सी.’ या नव्या संस्थेद्वारे भविष्यात केंद्र सरकार, रेल्वे, सरकारी बँका इत्यादी सरकारी आस्थापनांत भरती केली जाईल. यामुळे तरुण व्यक्तींना एकच परीक्षा द्यावी लागेल व त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळेल. आताच्या स्थितीत तरुणांना रेल्वेसाठी वेगळी, बँकांसाठी वेगळी आणि केंद्र सरकारसाठी आणळी वेगळी अशा अनेक परीक्षा द्यावा लागतात. त्यासाठी तरुणांना करावा लागणारा खर्च व सरकारला अशा अनेक परीक्षा घेण्याचा खर्च यांना आता चाप बसेल. ही झाली सकारात्मक बातमी. यातील दुसरी आणि काहीशी नकारात्मक बातमी म्हणजे मागच्या मंगळवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घोषणा केली की, यापुढे मध्य प्रदेशात सर्व सरकारी नोकर्‍या स्थानिकांनाच मिळतील. म्हणजे ‘भूमिपुत्रांसाठी १०० टक्के आरक्षण!’ मागच्या वर्षी मध्य प्रदेशात काँगे्रसचे सरकार होते आणि मुख्यमंत्रिपदी कमलनाथ होते. त्यांनी नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. आता सत्तेत असलेले भाजप सरकारने त्यांनाही मागे टाकत आरक्षण ७५ टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर नेले आहे.


अलीकडे अनेक राज्यांनी स्थानिकांना आरक्षण देणारे कायदे केले आहे. जुलै महिन्यात हरियाणाने खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देणार्‍या वटहुकूमाला मंजुरी दिली आहे. ५ ऑगस्ट, २०२० रोजी तेलंगण सरकारने नव्या खासगी उद्योगधंद्यांत ६० टक्के कुशल कामगार आणि ८० टक्के बिगरकुशल कामगारांचा रोजगार स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, असे निर्णय घटनाबाह्य ठरू शकतात. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार भारतात जात-धर्म-भाषा-वंश-लिंग वगैरेंचा आधार घेऊन भेदभाव करता येत नाही. राज्य सरकारांचे असे निर्णय घटनेतील या कलमाला हरताळ फासतात. अशा निर्णयांना न्यायपालिकेत वेळोवेळी आव्हान दिलेले आहे व न्यायपालिकेने असे निर्णय ‘घटनाबाह्य’ म्हणत रद्दही केलेले आहेत. मात्र, ‘अधिवास’ (डोमिसाईल) हा मुद्दा दडलेला असतो. त्याचा आधार घेऊन सरकारं असे आरक्षण देत असतात. आपल्या महाराष्ट्रातही किमान १५ वर्षांची अट आहेच. अधिवासाची अट कायद्याच्या चौकटीत टिकणारी आहे. म्हणून महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांची ही अट मान्य झालेली आहे. हे तपशील डोळ्यांपुढे ठेवल्यावर लक्षात येते की, स्थानिकांसाठी रोजगार या मुद्द्यावर ना भाजपचा विरोध आहे ना काँगे्रसचा ना प्रादेशिक पक्षांचा. सर्वांना लोकानुनयाचे राजकारण करावयाचे असल्यामुळे विरोधी पक्षांत असताना अशा धोरणांना थोडातरी विरोध करणारे पक्ष जेव्हा सत्तेत येतात, तेव्हा आधीच्या पक्षांपेक्षा जास्त आरक्षण स्थानिकांना देतात. यातील ‘लोकानुनयाचे राजकारण’ स्पष्ट आहे.
 
भारतासारख्या देशांत हा मुद्दा चर्चेत असणे हे अपरिहार्य आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात या मुद्द्याची सुरुवात जून १९६६ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या शिवसेनेने केली. सेनेने तेव्हा मुंबईतील नोकर्‍या पळवणार्‍या दाक्षिणात्यांच्या विरोधात आंदोलन छेडले होते व ‘हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ ही घोषणा लोकप्रिय केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना ‘संकुचित मनोवृत्तीचा नेता’ वगैरे म्हणत बदनाम केले होते. पण, तेव्हाची परिस्थिती व एकविसाव्या शतकातील परिस्थिती यात खूप अंतर आहे. काही वर्षांपूर्वी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामैय्या जाहीरपणे म्हणाले होते की, ‘कर्नाटकमें रहना होगा तो कन्नडीगा बोलनाही होगा।’ जी अवस्था १९६०च्या दशकात मुंबईची झाली होती (ज्यात आजही फरक पडलेला नाही) व ती म्हणजे, तेव्हा जसं मुंबईत मराठी भाषिक अल्पसंख्याक झाला होता, तसाच आता बंगळुरूमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्रांतीनंतर कन्नड बोलणारे अल्पसंख्याक झालेले आहेत.
 
यावर उपाय म्हणजे, ‘भूमिपुत्रांना प्राधान्य देणे’ हा आहे. तसं पाहिलं तर अनेक राज्यांनी भाषेचा आधार घेऊन गेली अनेक वर्षे असे आरक्षण दिलेले आहेच. तामिळनाडूत राज्य सरकारची नोकरी किंवा तेथील स्थानिक स्वराज संस्थांतील नोकरीच्या जाहिरातीत स्पष्टपणे म्हटलेले असते की, ‘स्थानिक भाषेचे ज्ञान असणार्‍यास प्राधान्य दिले जाईल.’ याचा अर्थ असा की, जर तामिळनाडूत राज्य सरकारची नोकरी हवी असेल, तर तामिळ भाषा आली पाहिजे. तसेच बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, तर ओडिशात ओडिया. याचे कारण भारत शेकडो वर्षांपासून बहुभाषिक देश राहिला आहे. हे वास्तव लक्षात घेऊनच आपण १९५६ साली ‘भाषावार प्रांतरचना’ हे तत्त्व मान्य करून देशाची पुनर्रचना केली होती आणि ‘एक भाषा-एक राज्य’ यानुसार राज्यं निर्माण केली होती. अशी समस्या युरोप किंवा अमेरिकेत येत नाही. तेथील देशांमध्ये आजही एकच भाषा देशाच्या सर्व भागात बोलली जाते. जर्मनीत जर्मन, फ्रान्समध्ये फ्रेंच असल्यामुळे तेथे ‘स्थानिक विरूद्ध बाहेरून आलेले’ असा संघर्ष उभा राहतच नाही. अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून मात्र परिस्थिती बदलत आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात अमेरिकन कारखानदार अमेरिकन तरूणांचा रोजगार काढून एक तर भारतातून काम करणार्‍या भारतीयाला देतो किंवा अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या भारतीयाला देतो. म्हणूनच आता अमेरिकेतील शहरी भागात भारत किंवा दक्षिण आशियातून अमेरिकेत गेलेल्या तरुणांवर कधी अमानुष हल्ले झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात.


आता भारतासारख्या देशांत हे सुरू झाले आहे. याची सुरुवात जरी १९६०च्या दशकात झालेली असली तरी तेव्हाची परिस्थिती आणि आताची म्हणजे इ.स. २०२० मधील परिस्थिती यांच्यात जमिनास्मानाचा फरक आहे. तेव्हा नोकर्‍या होत्या. आता मात्र नोकर्‍या फारशा नाहीत. खासगीकरण, जागतिकीकरण वगैरे धोरणांमुळे आता मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या जेथे मजुरी स्वस्त असेल त्या देशांत उत्पादन करतात. भारतातील कारखाना बंद करून तसाच कारखाना चीनमध्ये सुरू करतात. याचे साधे कारण म्हणजे चीनमध्ये मजुरीचे दर स्वस्त असतात. तेथे उत्पादन केले तर तीच वस्तू त्याच किंमतीत विकायची. पण, मजुरी कमी झाल्यामुळे उत्पादन खर्चात बचत आपोआपच बचत होते. याचाच खरा अर्थ नफा वाढतो. यावर मात करण्याचा एक उपाय म्हणजे भारतीय मजुरांच्या कौशल्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची वाढ करणे. दुसरा म्हणजे खासगी उद्योगांना आकर्षक सवलती देऊन त्यांनी नवीन कारखाने काढावे यासाठी त्यांना पायभूत सुविधा उपलब्ध करून देणे. प्रत्येक राज्यात ’उद्योगस्नेही’ वातावरण निर्माण करणे हेही गरजेचे आहे. हे सर्व करण्याऐवजी आपली राज्य सरकारं नोकर्‍यांतील आरक्षणाचा टक्का वाढवण्याचा साधा सोपा मार्ग चोखाळतात. १९९१ पासून सरकारी नोकर्‍या निर्माण होण्याचा दर झपाट्याने कमी झाला. सरकार स्वतःच स्वतःचे उद्योगधंदे विकायला काढते. चटकन डोळ्यांसमोर येणारे उदाहरण म्हणजे बीएसएनएल. ही जर वस्तुस्थिती असेल तर आणि सरकारी नोकर्‍यांत फारशी वाढ होत नसेल, तर १०० टक्के आरक्षण काय किंवा ८० टक्के आरक्षण काय, कशालाच अर्थ राहत नाही. गुजरात राज्यात २०१७ साली एक सर्वेक्षण केले होते. तेथील राजकारणी वर्ग स्थानिक नोकर्‍यांत ८० टक्के आरक्षण मागत आहे. सर्वेक्षण केल्यावर लक्षात आले की, तेथे ९२ टक्के नोकर्‍यांमध्ये स्थानिक आहेत! थोडक्यात म्हणजे देशातील बेरोजगारीवर आरक्षण हा उपाय नसून कल्पकतेने निर्णय घेऊन जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल, अशी धोरणं आखणे हा खरा उपाय आहे.
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@