मुंबई : राम मंदिराचा सातबारा कुणाच्या नावावर नाही, अशी भाजपवर टीका करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आमदार अतुल भातळखकर यांनी समाचार घेतला आहे. राम मंदिराचा सातबारा आमच्या नावावर नाही मात्र, बाबरीचा सातबारा मात्र तुमचा पक्ष आणि पक्षश्रेष्ठींच्याच नावावर असल्याबद्दल कुणाच्याच मनात संशय नाही, अशी टीका आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्यावर केली आहे.
भूमिपूजनाचा मुहूर्त जसजसा जवळ येत आहे तसे महाविकास आघाडीतील नेत्यांची वादग्रस्त विधाने पुढे येत आहेत. शरद पवार यांनीही यापूर्वी भूमिपूजनामुळे कोरोना जाणार नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून पवारांवर टीका झाली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा आता भाजपतर्फे समाचार घेतला जात आहे.