नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये एक मोठा निर्णय घेतला. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बिहारच्या पोलिसांची एफआयआर योग्यच असून हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नसल्याचेही ठणकावून सांगितले.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टिप्पणी केली होती. याबाबतीत त्यांना प्रश्न विचारला असता तिची त्यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नसल्याचे सांगितले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळाले असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने पटना येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचेही यावेळी सांगितले.