निवडणुकीपूर्वी सचिन अहिरांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पुत्रविजयासाठी ‘गळाला’ लावणार्यांनी आता नगरसेवकांसाठी असा ‘गळा’ काढला. तेव्हा, ‘इनकमिंग’ हवेहवेसे वाटते ना, मग जरा ‘आऊटगोईंग’चीही किंमत मोजायला शिका !
राजकारणामध्ये ‘आयाराम-गयाराम संस्कृती’ ही तशी जुनीच राजकीय (गैर)परंपरा. कार्यकर्ते, नेत्यांच्या या पळवापळवीतून देशातील कुठलाही पक्ष ‘वंचित’ नाही. काँग्रेस असेल अथवा भारतीय जनता पक्ष, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्षांतरंही केली आणि आपल्या पक्षात इतर पक्षीयांना सामावूनही घेतले. अगदी लहानात लहान कार्यकर्त्यापासून ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत अशी पक्षांतराची, सत्तापालटाची शेकडो उदाहरणे आपल्याला देता येतील. पण, ‘तुम्ही आमचे ढापलेले कार्यकर्ते, आता परत आमच्या पक्षात पाठवा,’ अशी बालिश मागणी राजकीय वर्तुळात मात्र ऐकिवात नव्हती. पण, पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमधील प्रवेश ‘मातोश्री’च्या एकदम जिव्हारी लागला आणि ‘आमचे नगरसेवक आम्हाला परत द्या’ म्हणून फोनाफोनी आणि पवारांसोबत बैठकांचेही सत्र रंगले. अखेरीस आता शिवसेनेच्या राष्ट्रवादीला विनवण्यांनंतर या नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन हाती पुन्हा ‘शिवबंधन’ही बांधले. खरं तर या नगरसेवकांची नाराजी शिवसेनेवर वा उद्धव ठाकरेंवर नसून स्थानिक नेतृत्वावर असल्याचे यापूर्वीच समोर आले. परंतु, तरीही आघाडीतील आपल्याच मित्रपक्षाने केलेली ही उचलाउचली शिवसेनेला चांगलीच झोंबली. त्यात या प्रकरणी संजय राऊत तर अजित पवारांना ‘क्लिनचीट’ देऊन मोकळेही झाले. त्यामुळे ‘ते नगरसेवक परत पाठवा,’ असा आदेश झाडण्यापूर्वी त्या नगरसेवकांच्या समस्या ‘मातोश्री’च्या कधीही कानी पडल्या नव्हत्या का? स्थानिक पातळीवर आपल्याच पक्षातील नाराजीची ‘मातोश्री’ला कानोकान खबर का लागली नाही? की त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले? पण, इथे ‘पक्षप्रमुख’ आणि ‘मुख्यमंत्री’ अशी दोन्ही जबाबादारी आपल्या खांद्यावर पेलणार्या उद्धव ठाकरेंशी जर आरोग्यमंत्र्यांचाच संपर्क वेळेत होऊ शकत नसेल, तर कार्यकर्त्यांची काय तर्हा? तेव्हा, निवडणुकीपूर्वी सचिन अहिरांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पुत्रविजयासाठी ‘गळाला’ लावणार्यांनी आता नगरसेवकांसाठी असा ‘गळा’ काढला. तेव्हा, ‘इनकमिंग’ हवेहवेसे वाटते ना, मग जरा ‘आऊटगोईंग’चीही किंमत मोजायला शिका!