मुंबई : "दीर्घ काळापासून सुरु असलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढेही सुरुच राहील. आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणी करीता पुढील तारीख दिली. माझी महाराष्ट्र शासनाला सूचना आहे की, पुढच्या आठवड्यात किंवा त्याही पुढे होणाऱ्या आरक्षण संबंधित प्रत्येक सुनावणीला अधिक गांभीर्याने आपण सामोरे जायला पाहिजे."असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला केले आहे.
तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याना त्यांनी खडे बोल सुनावले. यावेळी ते म्हणतात, "जे कुणी विरोध करीत आहेत, त्यांनी सुद्धा समाजहित डोळ्यासमोर ठेऊन मराठा आरक्षणाला विरोध न करता पाठिंबा दिला पाहिजे. देशात सर्वात पहिले आरक्षण बहुजन समाजाला राजर्षी शाहू महाराजांनी दिले. तेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर राज्यघटनेत समाविष्ट केले. त्या आरक्षणात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. प्रचंड त्यागातून मिळवलेल्या मराठा आरक्षणाला कुणीही विरोध करू नये. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण इतर कुणाही समाजाचे हक्क हिरावून मिळाले नाही."असे म्हणत त्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सुनावले.
पुढे ते म्हणाले, "सर्व समाज आज मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत. फक्त काही लोक या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे त्या सर्वांना माझी हीच विनंती असेल की, तुझं माझ न करता व्यापक समाजहित त्यांनी जपावं. आपण सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात सोबत राहत आलो आहोत. यापुढेही तसेच राहू."असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. दरम्यान आज सुनावणीदरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार असल्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.