प्रवाशांचे मोबाईल व मंगळसूत्र चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ
मुंबई : मुंबई उपनगरी सेवा १५ जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी धावत असतानाही तीमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकल सेवा अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी असल्याने रेल्वे स्थानकात अन्य कुठल्याही प्रवाशांना शिरकाव होऊ दिला जात नाही. तरीही लोकल मध्ये मोबाईल, मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत आहेत. गेल्या चार दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या असून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांबरोबर चोरांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे का, की रेल्वे परिसरातील सुरक्षा यंत्रणा कमी पडते, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी असतानाही वांद्रे, नेरुळ, घाटकोपर, या स्थानकातून प्रवाशांचे मोबाईल व मंगळसूत्र चोरीला गेले असून तब्बल ६० ते ७० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. २८ जुनला घाटकोपर स्थानकातून कल्याण दिशेला जाणाऱ्या प्रवाशाचा १३ हजार रुपये किंमतीचा, २९ जूनला विलेपार्ले स्थानकातूनच १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोराने हिसकावून पळ काढला, तर वसई स्थानकातून महिला प्रवाशाच्या गळ्यातून २५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कुठल्याही प्रवाशांना स्थानकात प्रवेश बंदी आसताना स्थानकात चोरीच्या घटना घडतातच कशा, असा प्रश्न अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
स्थानकात प्रवेश देताना ओळखपत्र तपासले जाते. गेल्या काही दिवसांत रेल्वे लोकल परिसरात चोरीच्या घटना घडल्याचे बोलले जाते. परंतु एखाद्या प्रवाशाचा मोबाईल गहाळ झाला असला तरी नोंद चोरीची करण्यात येते. एखाद्या प्रवाशाची तक्रार आल्यावर सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे. आता आलेल्या काही तक्रारींचा तपास सुरू असल्याचे रेल्वे जीआरपी क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी सांगितले.