महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पनवेल दौऱ्यावर आहेत. त्यांनी पनवेलमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे. टेस्टिंग वाढवले नाही तर कोरोनाचे संक्रमण वाढत जाईल. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पाहणी दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, दुपटीचा दर २४ दिवसांवर गेला असला तरी संख्या वाढत चालली आहे. आता रुग्णांना शासकीय रुग्णालयात जागा उरली नाहीय, त्यामुळे खासगी रुग्णालयात जावे लागते आणि ते न परवडणारे आहे, असे ते म्हणाले. सामान्य रुग्णांसाठी कोणतेही रुग्णालय उरले नाही. काम पटापट झाली पाहिजेत, पण ती कामे वेगाने होत नाहीत. तसेच वाशी बाजार समितीमध्ये रॅपिड टेस्टींग झाली पाहिजे, थर्मल टेस्टींगही वाढले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
यादरम्यान, आयुक्तांच्या बदल्या करताना पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले गेले पाहिजे. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तर ‘संख्येच्या व्यवस्थापनावर नको, तर रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या’, असे आवाहन ट्विटद्वारे त्यांनी प्रशासनाला केले आहे.