मुंबई : 'राज्य सरकराच्या कामाची पद्धत कळत नाही. लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं हे माहित नाही. परंतु राज्यातील जनतेला वेठीस धरणं योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अंतर्गत ताळमेळाच्या अभावामुळे हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचे सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते. यामुळे हे सरकार लवकर जाईल असं वाटते असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवलं. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही,' अशी खोचक टीकाही राज यांनी केली. 'करोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं लोकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण झाली आहे. सरकारचे निर्बंध, टीव्हीवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेजेसमुळे यात भर पडत आहे. काळजी घेणं गरजेचं आहे पण घरात बसून राहणेही योग्य नाही. त्यामुळे सरकरने लवकरात लवकर सर्व सुरळीत करायला हवे असेही राज ठाकरे म्हणाले.
तसेच , राज्यातील मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी, मात्र तिथे उगाच काही वाकडेतिकडे नियम लावता कामा नये, आज जगातील अनेक देशांत सगळं सुरळीत झालं आहे. पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे पण आता बंद ठेवणे हा मार्ग नाही.कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण राज्य सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.