रत्नागिरी : शहर भाजप युवा मोर्चाने ‘जय श्रीराम’ लिहिलेली दोन हजार पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठवण्यात आली आहेत. रत्नागिरी शहर भारतीय जनता युवा मोर्चाने ‘जय श्रीराम’ लिहिलेली दोन हजार पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठवली. पवार यांना प्रभू श्रीरामांची आठवण करून देण्यासाठी निषेध आंदोलन स्वरूपात राज्यातून १० लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत.
अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला श्रीराम मंदिराची उभारणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंदिर उभारणीने कोरोना जाणार का? असा सवाल उपस्थित केला होता. त्याला उत्तर म्हणून भाजयुमोने ‘जय श्रीराम’ असे लिहून दोन हजार पत्र पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवली आहेत.
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार ही पत्रे लिहिण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या नियोजनात ही पत्र पाठवली गेली. यावेळी निखिल बोरकर, पमु पाटील, चिटणीस मंदार खंडकर, संकेत बापट, केदार बोरकर, इशा फाटक, निशांत राजपाल, भाजप शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, संपदा तळेकर आदी यावेळी उपस्थित होते.