नवी दिल्ली : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर प्रतिबंध लावण्यात आले होते. ते काही दिवसांपूर्वी १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा हे प्रतिबंध ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे. देशांतर्गत विमान उड्डाण २५मे पासून सुरु करण्यात आली आहेत. २१ मे रोजी याविषयीच्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, अनलॉक २ ची घोषणा करताना केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी कायम ठेवली होती.
डीजीसीएच्या या आदेशामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीची विमाने आणि विशेष विमानसेवेवर काहीही परिणाम होणार नाही. डीजीसीएने २६ जूनला आदेश काढत १५ जुलैपर्यंत विमान उड्डाणंवर बंदी कायम ठेवली होती. वंदे भारत मोहिम ६ मे पासून सुरु करण्यात आली आहे. याद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे. देशातील जवळपास २० विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. या विमानतळांद्वारे ५५ देशांच्या ८० शहरांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या जगभरात कोरोनाचे थैमान आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा रोखणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये भारतातून ७ कोटी लोकांनी आंतरराष्ट्रीय विमानांतून प्रवास केला होता.