मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाचा अहवाल आज समोर आला. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षावरून विरोधी पक्ष भाजपने राज्यसरकार व मुंबई महापालिकेला लक्ष्य केले. सगळ्याच संकटात मुंबईकरांचे जे स्पिरीट दिसते तेच कोरोनामध्ये दिसले. उगाच पालिका आणि सरकारने आम्ही करुन दाखवलेचा दावा करु नये !असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यसरकार व मुंबई महापालिकेला लगावला.
ट्विट करत आशिष शेलार म्हणतात,"नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या ३ वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत ५७ % तर इमारतीमध्ये १६ % जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड. तर खाजगी लँबच्या सर्वेत सुमारे २५ % लोकांना कोरोना होऊन गेलाय? म्हणजे ४० % मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले ? झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला.चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही.आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय ?" असे म्हणत आशिष शेलार यांनी १ लाख अँटीबॉडी चाचण्या करा म्हणजे सत्य समोर येईल असे आव्हान राज्यसरकार व मुंबई महापलिकेला केले.