मुंबई : १ ऑगस्टपासून देशात बँकींगसह अन्य नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. बँकींग आणि वाहन खरेदीचे नियमही यात सामाविष्ठ आहेत. चला जाणून घेऊ आपल्या आयुष्यात १ ऑगस्टापासून नेमके काय बदल होणार !
वाहन खरेदी स्वस्त होणार
१ ऑगस्टपासून कार आणि वाहन आणि दुचाकीच्या विम्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल होणार आहेत. भारतीय विमा विकास व नियामक प्राधिकरण (इरडा) यांनी दिलेल्या निर्देशांनुसार वाहन खरेदी करताना तीन वर्षांसाठी दुचाकी व पाच वर्षांसाठी चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी थर्ड पार्टी विमा घेणे आवश्यक असणार नाही. इरडाने जूनमध्ये लाँग टर्म पॅकेज थर्ड पार्टी आणि ऑन डॅमेज इंशूरन्स पॉलीसी नियम रद्द केले आहेत. याच कारणांमुळे वाहनाच्या किंमतीत वाढ होत होती, त्यामुळे वाहन खरेदी करताना अडचणी येत.
बँकींग नियमांत बदल
बँकांनीही नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. १ ऑगस्टपासून खात्यात किमान शिल्लक नसल्यास त्याचा फटका ग्राहकाला बसणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खातेधारकांना मेट्रो आणि शहरी भागातील नागरिकांना दोन हजार रुपयांचे किमान शुल्क ठेवावे लागणार आहे. RBL बँकेने बचत खात्यातील व्याजासंदर्भात बदल केले आहेत. बचत खात्यात १ ते १० लाखांपर्यंत ६ टक्के व्याज दिले जाईल तर १० लाखांपासून ५ कोटींपर्यंतच्या व्याजावर ६.७५ टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे. ग्राहक आता एटीएममध्ये एका महिन्यात पाच वेळाच एटीएमद्वारे मोफत रक्कम काढू शकतात, त्यावरील व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे.
ई-कॉमर्स मंचावर 'कंट्री ऑफ ओरीजन'
ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांचे उत्पादन कुठल्या देशात तयार झाले आहे, याची माहिती प्रोडक्टसोबत द्यावी लागणार आहे. १ ऑगस्टपासून ई-कॉमर्स कंपन्यांना ही माहिती देणे अत्य़ावश्यक करण्यात आले आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इन्डस्ट्रीज् अॅण्ड इंटरनल ट्रेड (डीपीआईआईटी) यांनी ही माहिती दिली आहे.