मुंबई : राममंदिर भूमिपूजन सोहळा जसजसा जवळ येत आहे त्याबरोबरच डाव्या विचारसरणीच्या काही नेत्यांमधून वादग्रस्त विधाने देखील येत आहे. आश्चर्यकारक म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स वा ई-भूमिपूजनाचा पर्याय निवडावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर एमआयएमचे इम्तियाझ जलील यांनीही केली. या एकसुरी मागणीवर आश्चर्य व्यक्त करत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या आज विधानभवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राम मंदिराचे भूमिपूजन ठरल्याप्रमाणे होणार आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असून सर्व हिंदू धर्मीयांसाठी हा उल्हासाचा क्षण असणार आहे. या सोहळ्यानिमित्त आम्ही ठिकठिकाणी महोत्सव साजरा करणार आहोत. ऑनलाईन भूमिपुजनाची मागणी एमएमआयएमने केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केली. एमआयएम आणि शिवसेना यांच्या मागणीतील एकसूर आश्चर्यकारक असली तरीही करोडो हिंदूंची ही इच्छा आहे की पंतप्रधानांनी राममंदिर भूमिपूजन करावे त्यामुळे त्याच पद्धतीने हा सोहळा होईल. यावेळी कुठेही गर्दी होणार नाही ही मंदिर ट्रस्टने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.