मुंबई : राज्यातील सरकार अस्तित्वातच नाही, कामकाजाची पद्धत मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन नाही. चाचण्याची क्षमता वाढवण्याची चिन्हे नाहीत, शेतकरी, ऊस उत्पादकांना दिलासा नाही, अशी काहीच माहिती नसणाऱ्या या सरकारला अस्तित्वच नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘संपादक’ खासदार संजय राऊत यांना राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय करावे, कुठल्या खात्याकडे मदत मागावी याची माहितीही नाही, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील चाचण्या कमी करून सरकार सत्य लपवू पाहत आहे. केवळ पाच ते सहा हजार चाचण्या दिवसाला करून कोरोनाचा आकडा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मुंबई कार्यलायातील बैठकीत राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. मुंबईतील कमी झालेल्या कोरोना चाचण्यांची संख्या, पुण्यातील परिस्थितीकडे केले जाणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. राज्य सरकारला केंद्राकडून भरगोस मदत मिळाली आहे. परंतू ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात राज्यातील सरकार अपयशी ठरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.