नवी दिल्ली : चीनवर भारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने आणखी ४७ चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी भारताने चीनचे ५९ अॅप्स बॅन केले होते. त्याचेच क्लोन म्हणून यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे. परंतु, अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपीनंतर भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत त्यांच्या ५९ अॅप्सवर बंदी घातली होती.
आणखी २७५ चिनी अॅप्सची यादी तयार
तसेच, आता सरकारने पुन्हा आणखी २७५ चिनी अॅप्सची यादी तयार केली आहे. यामध्ये गेमिंग अॅप पब्जी देखील आहे. एका अंदाजानुसार, भारतातचीनी इंटरनेट कंपन्यांचे सुमारे ३०० कोटी युनिक युजर्स आहेत. हे अॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा लोकांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत का? याबाबत सरकार एक यादी तयार करून, हे तपासत आहे. यासर्व चिनी अॅप्ससंदर्भात माहिती गोळा केली जात असून त्यासंदर्भात चौकशी सुरु आहे. तसेच यासर्व अॅप्सना फंडिंग कुठून मिळते, यासंदर्भातही माहिती गोळा करण्यात येत आहे. यापैकी काही अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचेही समोर आले आहे, तर काही अॅप्स डाटा शेअरिंगच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सरकारने तयार केलेल्या नवीन यादीमध्ये टेंसेंट कंपनीच्या लोकप्रिय गेम पब्जीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, शाओमीची जिली, ई-कॉमर्स दिग्गज अलिबाबाची अलीएक्सप्रेस आणि टिकटॉकच्या मालकीची कंपनी बाईटडन्सचा रेसो आणि यूलाइक्स अॅप्सचा समावेश आहे. या डेव्हलपमेंटमधील संबंधित व्यक्तीने सांगितले की, सरकार या सर्व २७५ अॅप्स किंवा त्यामधील काही अॅप्सवर बंदी घालू शकते. मात्र, कोणतीही अनियमितता आढळली नाही, तर अॅप्सवर बंदी घातली जाणार नाही.