नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधील रणबीरगढमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद ठार झाले आहेत. पोलिस आणि सुरक्षा दलाने ही कारवाई केली. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती नरेश मिश्रा आर्मी १० सेक्टर कमांडर यांनी दिली आहे. श्रीनगर जवळील रणबीरगढमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हाती घेतलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
मंगळवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी भारतीय लष्कराच्या ३८ राष्ट्रीय रायफल्ससहित जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचे लपण्याचे अड्डे उद्धवस्त केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाने थानामंडी भागात शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या अतिरेक्यांशी चकमक झाली. पोलीस आणि लष्कराच्या थानामंडी येथील ३८ राष्ट्रीय रायफल्सनी मन्याल भागात सुरू केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान चकमक झाली होती. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील नागनाद-चिम्मर भागात चकमकीत जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी गटातील ३ दहशतवादी ठार झाले होते, तर तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.