मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतला पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवले आहे. कंगनाचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी हे समन्स पाठवले आहे. कंगना सध्या हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे तिच्या मूळ गावी आहे. २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान कोणत्याही दिवशी सकाळी ११ वाजता वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यास सांगितले. कंगनानेही आपले वकील ईशकरण भंडारी यांच्यामार्फत समन्सला उत्तर पाठवले आहे आणि तिला विचारण्यात येणारे प्रश्न पाठविण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊनमुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना हिने जबाब देण्यासाठी आपणहून पुढाकार घेतला. पोलिसांचा समन्स पोहचण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे.
कंगनाने पाठविलेल्या पत्रात तिचे म्हणणे काय ?
वांद्रे पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांच्या नावाने पाठविलेल्या या पत्रात भंडारी यांनी लिहिले आहे, माझ्या क्लाईंट (कंगना राणावत) यांना तुमची नोटीस मिळाली असून त्यांनाही सुशांतसिंग राजपूत यांच्या रहस्यमय मृत्यूबद्दल चिंता आहे. एडीआर नं. ४३ /२०च्या अनुसार या तपासास शक्य त्या प्रत्येक मार्गाने मदत करण्यास त्या तयार आहेत. तथापि, माझी क्लाईंट टाळेबंदीमुळे १७ मार्च २०२०पासून तिच्या मनालीच्या घरी आहेत. म्हणून त्या कोरोना विषाणूच्या संकटा दरम्यान प्रवास करू शकणार नाही.
या पत्रात पुढे म्हंटले आहे की, त्यांची विनंती आहे की, आपण त्यांना प्रश्न पाठवा ज्याची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घेणे तुम्हाला आवश्यक आहे. शक्य असेल तर तुमचा एखादा अधिकारी हिमाचल प्रदेश मनाली येथे पाठवून क्लाईंटची चौकशी करू शकेल अशी विनंतीही त्यांनी केली आहे. आपण मनालीला येऊ शकत नसल्यास कृपया आम्हाला त्याबद्दल कळवा जेणेकरुन आम्ही त्यांचे विधान नोंदविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाची व्यवस्था करू. या विनंतीवरील आपल्या मंजुरीचे स्वागत असेल.
मागील समन्सबाबतीत आलेल्या वृत्ताचे कंगनाने केले होते खंडन
कंगनाचा जबाब घेण्याबाबत पोलिसांनी तिला ३ जुलै रोजी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी कंगनाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी समन्स घ्यायला नकार दिला होता. पोलीस कंगनाच्या जबाब घेण्याबाबत अधिकृत काहीच बोलले नव्हते. यामुळे कंगनाने ट्विट करुन आपल्याला जबाब द्यायचा आहे. मात्र मुंबई पोलीस आपल्याशी संपर्क साधत नसल्याचे म्हंटले होते.