मुंबई : सध्या राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना’ला दिलेली मुलाखत चांगलीच गाजत आहे. “माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा,” असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत विरोधी पक्षाला आव्हान दिले आहे. यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी, ‘कोणत्याही सत्ताधाऱ्यांची सरकार पडण्याची इतकी घाई कधीच बघितली नाही’ असा टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधीपक्षांना आव्हान केले आहे.
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये त्यांनी “माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा” असे वक्तव्य केले. याआधीही अनेक महाविकासआघाडीच्या नेत्यांनी असे विधान केले आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट केले की, “पहिल्यांदा बघितले असेल की, मुख्यमंत्री सकट सगळे मंत्री सांगत आहेत. आमचे सरकार पाडा, इतकी घाई कधीच पाहिली नाही.” असा टोला त्यांनी लगावला आहे.