मुंबई : सध्या महाविकासआघाडीमध्ये कुरघोडीचे राजकारण चालू आहे. तिन्ही पक्षांमधील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. अशामध्ये कॉंग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी आमचा मान राखला जात नाही असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना महाविकास आघाडीमधील ही कुरकुर मुख्यमंत्री ठाकरेंच्या डोक्याला ताप ठरते आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. यामध्ये सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. तसेच मान राखला जात नाही. काँग्रेस आमदारांची कामे होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार असाही प्रश्न आमदार सुभाष धोटे यांनी विचारला.