नवी दिल्ली : भारताने चीनी कंपन्यांच्या ५९ अॅप्सवर बंदी घातल्यानंतर त्या कंपन्यांना सरकारकडून लागू करण्यात आलेल्या आदेशाचे कडक पालन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कंपन्यांनी आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास, कंपन्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षानंतर सरकारकडून, २९ जून रोजी देशाच्या सुरक्षेस धोका असल्याचे सांगत टिक टॉक, कॅमस्कॅनर आणि यूसी ब्राऊझरसह ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयटी मंत्रालयाने आता या सर्व कंपन्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या प्रतिबंधित अॅप्सची उपलब्धता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुरु ठेवणे केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि इतर लागू कायद्यांअंतर्गत गुन्हादेखील आहे. कोणत्याही कंपन्यांकडून चीनी अॅप्स चालू ठेवल्यास गंभीर कारवाई केली जाऊ शकते.