मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणारी आयसीसीची यंदाची टी- २० विश्वचषक स्पर्धा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. आयसीसीकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑस्ट्रलियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, अद्याप कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे आता बीसीसीआयसाठी आयपीएल आयोजनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
बीसीसीआयने आयपीएल २०२०ची आयोजनाची तयारी सुरु केली आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आता टी – २० स्पर्धा रद्द झाल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
पटेल यांनी सांगितले की, “पुढचा आठवडा किंवा जास्तीत जास्त १० दिवसांमध्ये गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल. या बैठकीत आयपीएलच्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय होऊन त्याबद्दल घोषणा केली जाईल. सध्यातरी आयपीएलचं आयोजन हे याआधी ठरल्याप्रमाणेच म्हणजेच ६० सामन्यांसह होणार आहे. यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवली जाण्याची शक्यता जास्त आहे.” त्यामुळे आता बीसीसीआयकडून काय अधिकृत घोषणा येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.