विश्व मंगल साधनेचे आम्ही मौन पुजारी...

    18-Jul-2020
Total Views | 89
modi_1  H x W:



भारताच्या आत्म्याला जागृत करुन भारताचे स्वत्व प्रकट करण्याची वेळ आली आहे. ही प्रक्रिया ईश्वराच्या योजनेनुसार आणि आशीर्वादाने प्रारंभ झाली आहे. भारताच्या या आत्म्याला नाकारणारे तत्त्व कितीही विरोध करु द्या, भारतविरोधी परकीय शक्ती कितीही जोर लावू द्या, भारताच्या जनतेचा संकल्प आता प्रकट झाला आहे. भारताच्या राष्ट्रीयतेला जागृत करण्याच्या या वैश्विक कार्याला दशकानुदशकांपासून निरलस, प्रसिद्धीपासून दूर, एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत करणार्‍यांचे वर्णन ‘विश्व मंगल साधनेचे आम्ही मौन पुजारी’, असे केले गेले आहे. विश्वमांगल्याच्या साधनेच्या पुजार्‍यांची ही तपस्या आणि परिश्रम यशस्वी होतीलच.


भारत आणि हे विश्वदेखील सध्या एका नव्या भारताची अनुभूती घेत आहे. कारण, भारताची परराष्ट्र नीती, संरक्षण नीती आणि अर्थ नीतीमध्येमध्ये एक मूलभूत परिवर्तन झाले आहे. परराष्ट्र आणि संरक्षण नीतीमध्ये आलेल्या परिवर्तनामुळे भारतीय सैन्याचे बल आणि मनोबल वाढले आहे. जगात भारताची पत-प्रतिष्ठा मजबूत झाली आहे. अधिकाधिक देश भारताचे समर्थन करत असून सहकार्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होतेवेळीही १९३ देशांपैकी महत्त्वाच्या १८४ देशांनी भारताचे समर्थन केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या भारताने मांडलेल्या प्रस्तावालादेखील संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी स्वीकृती दिली.


सौरऊर्जेसहित अनेक विषयांत जगातील बहुसंख्य देशांना एकजुट करण्यात भारताचा पुढाकार आणि भूमिका महत्त्वाची आहे. भारताचे महत्त्व वाढणे, शक्तीशाली आणि समृद्ध होणे, संपूर्ण मानवता आणि पर्यावरणासाठीदेखील वरदानच सिद्ध होईल. कारण, भारताची विश्वदृष्टी स्पर्धा नव्हे संवाद, संघर्ष नव्हे समन्वय आणि केवळ मनुष्यसृष्टी नव्हे, तर संपूर्ण चराचर जगताचा एकात्म आणि सर्वांगीण विचार करणारी आहे. जगात भारत असा अनोखा देश आहे, जो केवळ स्वतःचाच विचार करत नाही. कारण, मुळात आपली सांस्कृतिक दृष्टीच तशी नाही.


अर्थ नीतीमध्ये मोठ्या परिवर्तनाची आवश्यकता आहे. परंतु, आर्थिक चक्राच्या वेगामुळे आमूलाग्र परिवर्तन करणे तितकेसे सोपे नक्कीच नाही. वर्तमानातील कोरोना महामारीमुळे आर्थिक चक्र थांबल्यासारखे झाले आहे. सदर संधीचा उपयोग करुन भारत सरकारने आर्थिक नीतीमध्ये सुधारणा करण्याचा मनसुबा दाखवून दिला आहे. परंतु, ७० वर्षांपासूनच्या अर्थव्यवस्थेचे पुनरायोजन (realignment) करण्यासाठी धाडस, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमतेबरोबरच धैर्यपूर्ण, सतत सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या सर्वच प्रयत्नांमध्ये आपल्या एकात्म, सर्वांगीण, सर्वसमावेशक मूलभूत विश्वदृष्टीच्या प्रकाशात वर्तमान संदर्भ लक्षात घेऊन युगानुकूल नव्या गतिविधींना स्वीकारत योजना तयार करावी लागेल. भारत आता या दिशेने पुढे चालला आहे. आता भारत ‘भारत’ या नात्याने अभिव्यक्त होत आहे, दृढतेने पुढे जात आहे. जग हे पाहत आहे, अनुभव घेत आहे. हे परिवर्तन, भारताला आपलेसे आणि जगाला नवे वाटत आहे.


दशकानुदशकांच्या ज्या राष्ट्रीय जागरणाच्या दीर्घ प्रयत्नांच्या परिणामी हे मूलभूत परिवर्तन आले, त्या सामाजिक चेतनेचा वामपंथी आणि त्यांनी प्रेरित केलेल्या-पोसलेल्या पत्रकार तथा लिबरल्स-इंटलेक्चुअल्सनी ‘राष्ट्रवादी’ नाव देत निरंतर विरोध केला आहे. वास्तवात हे ‘राष्ट्रीय’ आंदोलन आहे, ‘राष्ट्रवादी’ नव्हे. ‘राष्ट्रवाद’ हा शब्द भारतीय नाही, ना त्याची संकल्पना. हा शब्द पश्चिमेतील राज्याधारित राष्ट्र (nation-state) मधून उत्पन्न झाला आहे. म्हणूनच तिथे 'nationalism' अर्थात ‘राष्ट्रवाद’ आहे. पश्चिमेतल्या या राष्ट्रवादाने जगाला दोन महायुद्धे दिली. तिथला राष्ट्रवाद भांडवलवादाची देणगी आहे आणि तो ‘सुपर-राष्ट्रवाद’ (super-nationalism) साम्यवादाच्या श्रेणीमध्ये येतो. रशियाने आपल्या साम्यवादी विचारांना, प्रदीर्घ अनुभव घेतल्याशिवाय, मध्य आशिया आणि पूर्व युरोपीय देशांमध्ये कशाप्रकारे जबरदस्तीने थोपवण्याचा प्रयत्न केला, हे सर्वविदित आहे. चीनदेखील त्याचप्रकारे आपल्या विस्तारवादी वृत्तीने हाँगकाँग आणि दक्षिण आशियाई देशांवर जबरदस्ती करुन चिनी साम्राज्यवादाचा परिचय देत आहे, हे जगात उघड झाले आहे. एका अंदाजानुसार, सहा देशांच्या ४१ लाख वर्ग किमी क्षेत्रावर चीनने कब्जा केलेला असून २७ देशांशी त्याचा वाद सुरु आहे. म्हणूनच जगातील बहुसंख्य देश चीनच्या साम्राज्यवाद वा सुपर राष्ट्रवादाविरोधात एकजुट होत असल्याचे दिसते.

भारतीय विचारांत ‘राष्ट्रवाद’ नाही, तर ‘राष्ट्रीयते’चा भाव आहे. आपण ‘राष्ट्रवादी’ नव्हे, तर ‘राष्ट्रीय’ आहोत. याच कारणामुळे संघाचे नाव ‘राष्ट्रवादी स्वयंसेवक संघ’ नव्हे, तर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आहे. आम्हाला कोणताही ‘राष्ट्रवाद’ आणायचा नाही. भारताची राष्ट्राची अवधारणा भारतीय जीवनदृष्टी (view of life) वर आधारित आहे. इथे ‘राज्य’ नव्हे तर लोक (people) ही राष्ट्राची संज्ञा आहे. विविध भाषा बोलणारे, अनेक जातींच्या नावाने ओळखले जाणारे, विविध देवीदेवतांची उपासना करणारे भारतातील सर्वच लोक या अध्यात्माधारित एकात्म, सर्वांगीण जीवनदृष्टीला आपलेच मानतात आणि याच माध्यमातून संपूर्ण समाज तथा या भूमीशी स्वतःला जोडलेले समजतात. आपल्या प्राचीन आर्ष दृष्टीने सत्य काय ते पाहून ते वर्तमान परिप्रेक्ष्याशी जोडून आचरण करणे हेच भारताच्या राष्ट्रीयतेचे प्रकटणे आहे. आपली ही समान ओळख आणि आपले आपापसातील बंधुभावाचे नाते उजळ करुन आपलेपणाने समाजाला देण्याचा संस्कार जागवणे म्हणजे राष्ट्रीय भावाचे जागरण करणे आहे. समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या ‘राष्ट्रत्वा’चे प्रकट होणे, अभिव्यक्त होणे, हेच राष्ट्रीय पुनर्निर्माण आहे. हे राष्ट्राच्या स्वत्वाचे जागरण आणि प्रकटीकरण आहे. राष्ट्राच्या ‘स्वत्वा’चे प्रकटणे, ‘राष्ट्रवाद’ कदापि असू शकत नाही.


चीनच्या विस्तारवादी आक्रमक भूमिकेच्या आताच्या काळातील काही घटनांना भारताने दिलेले उत्तर आणि प्रतिसादाबाबत वामपंथियांनी हा भारताचा ‘सुपर-राष्ट्रवाद’ (super-nationalism) असल्याचा प्रचार केला. वस्तुतः वामपंथ भारताचे ‘स्वत्व’ कधीही समजून घेऊ शकला नाही. वर्तमान संदर्भात जे प्रकट होत आहे, तो ‘राष्ट्रवाद’ नव्हे, तर आतापर्यंत नाकारलेले, दमन केलेले भारताचे ‘स्वत्व’ आहे आणि भारताचा विचारच ‘वसुधैव कुटुम्बकम’ वर्तमान आणि ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ हा राहिला आहे. म्हणूनच भारताच्या या ‘स्वत्व’ जागरण आणि ‘आत्मनिर्भरते’च्या आधारावर शक्ती संपन्न होण्याच्या योजनेविषयी कोणीही भीती बाळगायला नको, कारण हा भारत आहे, जो जागृत होत आहे.


भारताच्या या स्वत्व प्रकटीकरणाचा भारतातच होत असलेला विरोध काही नवीन गोष्ट नाही. स्वातंत्र्यानंतर जुनागढ संस्थानाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. तिथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराची उद्ध्वस्त अवस्था पाहून त्यांना अत्यंत दुःख झाले. देश स्वतंत्र झाल्याने भारताच्या या गौरवस्थानाच्या पुनर्स्थापनेचा संकल्प त्यांच्या मनात जागृत झाला. सदर कार्याचे उत्तरदायित्व पटेल यांनी पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री कन्हैय्यालाल मुन्शी यांच्याकडे सोपवले. सरदार पटेल यांनी ही माहिती महात्मा गांधी यांना दिली, तेव्हा गांधीजींनी याचे समर्थन केले. परंतु, हे कार्य सरकारी पैशाने नव्हे, तर जनतेद्वारे एकत्र केलेल्या पैशातून करण्याची सूचना केली. गांधीजींची ही सूचना तत्काळ स्वीकारली गेली. पुढे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. त्या कार्यक्रमातील डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे भाषण उल्लेखनीय आहे.


परंतु, पंडित नेहरुंचा यावर आक्षेप होता. ज्या घटनेला सरदार पटेल, कन्हैय्यालाल मुन्शी, महात्मा गांधी आणि राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे मूर्धन्य नेते भारताच्या गौरवाच्या पुनर्स्थापनेच्या रुपात पाहात होते, त्याच घटनेला पंतप्रधान नेहरु यांनी ‘हिंदू पुनरुत्थानवाद’ (Hindu revivalism) म्हणत विरोध केला. इथेच स्पष्ट होते की, भारताचे स्वत्व नाकारणे, त्याच्या प्रकटण्याला विरोध करणे, हे तेव्हाही होते. परंतु, त्यावेळी राष्ट्रीय विचारांचे लोक, काँग्रेसमध्येही अधिक संख्येने होते. म्हणूनच हे कार्य शक्य झाले. पुढे क्रमाक्रमाने, योजनाबद्ध पद्धतीने राष्ट्रीय विचारांच्या नेतृत्वाला बाजूला सारले जाऊ लागले आणि साम्यवादाचा प्रभाव काँग्रेसमध्ये वाढत गेला. साम्यवाद आध्यात्मिकतेलाच मानत नाही, इतकेच नव्हे तर साम्यवाद या ‘राष्ट्र’ संकल्पनेलाही मानत नाही. साम्यवाद प्रकारांतराच्या नावाखाली भांडवलवादासारख्या वसाहतवादी मानसिकतेचा प्रतिनिधी आहे. आधी सोव्हिएत संघ आणि आता चीनदेखील हीच विस्तारवादी आणि अधिनायकवादी मानसिकता दाखवत आहे. म्हणूनच भारताच्या स्वत्वाचा मुद्दा समजून घेण्यात ते असमर्थ आहेत वा जाणूनबुजून त्याचा विरोध करत आहेत, जेणेकरुन हा देश एका सुत्रात जोडला जाऊ नये, तर तुकडे तुकडे होऊन अस्ताव्यस्त व्हावा, कमकुवत व्हावा.


अशा परिस्थितीत आपले कर्तव्य काय आहे, याचे स्पष्ट आणि सटीक मार्गदर्शन करणारे चित्र गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १९०४ साली प्रकाशित ‘स्वदेशी समाज’ निबंधामध्ये रेखाटलेले दिसते. हे सत्य आहे की, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रवादाचा विरोध केला. पण, ते वसाहतवाद वा ‘कोलोनियलिझम’ (colonialism) आणि महायुद्धाच्या परिणामांच्या पृष्ठभूमीवर पश्चिमेतील ‘नेशन-स्टेट’ आधारित राष्ट्रावादा (nationalism) विरोधात होते. भारताच्या राष्ट्रीयता म्हणजेच ‘स्वत्वा’च्या बाजूने ते कसे होते, याचे प्रमाण ‘स्वदेशी समाज’ निबंध आहे. यात ते लिहितात की-


“आपले शरीरावर पांघरुण घेऊन चुपचाप एका कोपर्‍यात पडून राहण्याला ‘आत्मरक्षा’ म्हणत नाही, हे आज आम्हाला चांगल्याप्रकारे ज्ञात झाले आहे. आपल्या अंतर्निहित शक्तीला जागृत तथा संचरित करणे, हाच आत्मरक्षेचा योग्य उपाय आहे. हाच विधात्याचा नियम आहे. जोपर्यंत आपण जडतेचा त्याग करण्यासाठी आपल्या उद्यमशक्तीचा उपयोग करत नाहीत, तोपर्यंत ब्रिटिश आपल्या मनाला पराभूत करतच राहतील. प्रत्येक गोष्टीत ब्रिटिशांचे अनुकरण करुन, छद्मवेश धारण करुन, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणे हेदेखील स्वतःला ठकवण्यासाखेच आहे. आपण अस्सल ब्रिटिश होऊ शकत नाही आणि बनावटी ब्रिटिश होऊन ब्रिटिशांना धोकाही देऊ शकत नाही. आपली बुद्धी, अभिरुची, हृदय सर्व काही पाण्याच्या भावात विकले जात आहे. याचा प्रतिकार करण्याचा एकच उपाय आहे. आधी आपण जे अस्सल आहोत, ते होणे. ज्ञानपूर्वक, सरळ तथा सजीव भावाने संपूर्ण रुपाने आपल्याला आपले ‘आपलेपण’ प्राप्त करावेच लागेल.


देशातील तपस्व्यांनी ज्या शक्तीचा संचय केला, ती बहुमूल्य आहे. विधाता ती कधीही निष्फळ होऊ देणार नाही. म्हणूनच योग्य वेळी त्याने या निश्चेष्ट भारताला कठोर वेदना देऊन जागृत केले. अनेकतेमध्ये एकतेची प्राप्ती आणि विविधतेमध्ये ऐक्याची स्थापना, हाच भारताचा अंतर्निहित धर्म आहे. ‘विविधता म्हणजे विरोध’ असे भारताने कधीही मानले नाही. ‘परकीय म्हणजे शत्रू’ अशीही भारताने कधी कल्पना केली नाही. जे आपले आहे, त्याचा त्याग केल्याविना, कोणाचाही विनाश न करता, एका व्यापक व्यवस्थेमध्ये सर्वांना स्थान देण्याची त्याची इच्छा आहे. सर्व पंथांचा भारत स्वीकार करतो. आपापल्या स्थानी प्रत्येकाचे महत्त्व तो पाहू शकतो. भारताचा हाच गुण आहे. म्हणूनच कोणत्याही समाजाला आपला ‘विरोधी’ मानून आपण भयभीत होत नाही. प्रत्येक नव्या संयोजनातून अंतिमतः आपण आपल्या विस्ताराचीच अपेक्षा करु. हिंदू, बौद्ध, मुसलमान तथा ख्रिश्चन भारताच्या भूमीवर परस्परांत युद्ध करुन मरुन जाणार नाहीत. इथे ते एक सामंजस्य प्राप्त करतीलच. ते सामंजस्य अहिंदू असणार नाही, तर ते असेल विशेष रुपाने हिंदू! त्याचे अंग-प्रत्यंग भलेही देश-विदेशाचे असेल, परंतु, त्याचा प्राण, त्याचा आत्मा भारतीय असेल.


आपण भारताच्या या विधाता-निर्दिष्ट आदेशाला स्मरणात ठेवले, तर आपली लज्जा दूर होईल, लक्ष्य स्थिर होईल. भारतात जी मृत्यूहीन (अमर) शक्ती आहे, त्यामुळे आपले अनुसंधान होईल. युरोपीय ज्ञान-विज्ञानाला आपल्याला प्रत्येक वेळी विद्यार्थ्याच्या रुपात ग्रहण करायचे नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञान-विज्ञानाच्या सर्व पंथांना भारताची सरस्वती एकाच शतदल कमळामध्ये विकसित करेल, त्याची खंडितावस्था दूर करेल. आपले भारतीय मनिषी डॉक्टर जगदीशचंद्र बसु यांनी वस्तुत्व, वनस्पतित्व तथा जन्तुत्वाला एकाच क्षेत्राच्या सीमेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोणास ठावूक, एक मनस्तत्वालादेखील ते त्यात आणून उभे करतील. हे ऐक्य-साधन भारतीय प्रतिभेचे मुख्य कार्य आहे. भारत कोणाचा त्याग करण्याच्या वा कोणाला दूर ठेवण्याच्या बाजूने नाही. एके दिवशी भारत सर्वांचा स्वीकार करुन, सर्वांना ग्रहण करुन, एका विराट एकतेमध्ये प्रत्येकाला आपली आपली प्रतिष्ठा उपलब्ध होण्याच्या एकतेचा मार्ग, विवाद आणि व्यवधानांनी ग्रस्त या पृथ्वीला दाखवून देईल.


तो विलक्षण क्षण येण्याच्या आधी तुम्ही सर्व त्याला एकदा ‘आई’ म्हणून हाक मारा. भारतमाता सर्वांना आपल्याजवळ बोलावण्यासाठी, अनेकतेला मिटवण्यासाठी, सर्वांचे रक्षण करण्यासाठी सदैव तयार आहे. तिने आपल्या चिरसंचित ज्ञान, धर्माला विविध रुपांनी, विविध प्रसंगी आपल्या सर्वांच्या अंतःकरणात संचारित केले आहे, तथा आपल्या मनाला पराधीनतेच्या अंधार्‍या रात्रीत विनाशापासून वाचवले आहे. आपल्या संतानांनी गजबजलेल्या या यज्ञशाळेमध्ये देशाच्या मध्यस्थानी मातेला प्रत्यक्ष प्राप्त करण्यासाठी प्राणपणाने आपण प्रयत्न करु.” (स्वदेशी समाज)


भारताच्या आत्म्याला जागृत करुन भारताचे स्वत्व प्रकट करण्याची वेळ आली आहे. ही प्रक्रिया ईश्वराच्या योजनेनुसार आणि आशीर्वादाने प्रारंभ झाली आहे. भारताच्या या आत्म्याला नाकारणारे तत्त्व कितीही विरोध करु द्या, भारतविरोधी परकीय शक्ती कितीही जोर लावू द्या, भारताच्या जनतेचा संकल्प आता प्रकट झाला आहे. भारताच्या राष्ट्रीयतेला जागृत करण्याच्या या वैश्विक कार्याला दशकानुदशकांपासून निरलस, प्रसिद्धीपासून दूर, एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत करणार्‍यांचे वर्णन ‘विश्व मंगल साधनेचे आम्ही मौन पुजारी’, असे केले गेले आहे. विश्वमांगल्याच्या साधनेच्या पुजार्‍यांची ही तपस्या आणि परिश्रम यशस्वी होतीलच.


भारताच्या ‘स्वत्वा’ला शक्ती आणि गौरवासह पुनर्स्थापित करण्याच्या या ऐतिहासिक काळात भारतातील सर्व लोकांनी आपले राजकारण आणि अन्य निहित स्वार्थ बाजूला ठेवून एकतेचा परिचय द्यावा आणि स्वाभिमानपूर्ण आत्मनिर्भर-भारताच्या निर्मितीच्या या प्रवासामध्ये सहभागी व्हावे, ही अपेक्षा या राष्ट्राची आपल्या सर्वांकडून आहे.
- डॉ. मनमोहन वैद्य
(लेखक रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह आहेत.)
(अनुवाद : महेश पुराणिक)
अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसा..

मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५; माध्यमविश्वातील हिरक महोत्सव!

मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५; माध्यमविश्वातील हिरक महोत्सव!

प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121